वाल्हे -पुरंदर तालुक्यातील वाल्हे परिसरात अवकाळी पावसामधून बचावलेल्या पिकांवर विविध रोग आल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे. अवकाळीनंतर आता ढगाळ हवामान झाल्याने फळबागा, पिकांवर करपा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने उत्पादन व उत्पन्न घटल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.
शेतकरी शेतीला जोडधंडा म्हणून दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. ओला चारा म्हणून मका, कडवळ आदी चारा करतात. काही दिवसापासून मका पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मका पीक वाचवण्यासाठी अनेक शेतकरी औषध फवारणी करीत आहेत. लष्करी अळी मका पिकांवर आली आहे. पाने खाऊन कोब्यामध्ये अळी राहात आहेत.
हाच मका चाऱ्यामधून जनावरांच्या पोटामध्ये गेल्यावर जनावरांचे पोट फुगून जनावरे दगावण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मका पिकांवर लष्करी आळीचा नाश करण्यासाठी औषध फवारणी करीत आहेत. करोनामुळे दूध, भाजीपाल्याचे बाजारभाव गडगडल्याने अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्याला मका पीक वाचवण्यासाठी खर्चिक औषध फवारणी करावी लागत आहे.