नागपूर – महाराष्ट्राची राजधानी मुंबई महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुरक्षित असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सभागृहाला दिली. महाराष्ट्रात महिलांविरोधातील गुन्ह्यांत वाढ झाल्याचे चित्र सध्या रंगवले जात आहेत. पण त्यात कोणतेही तथ्य नाही. महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत महिलांसाठी फार सुरक्षित आहे. विशेषतः मुंबईत महिला मध्यरात्री १२ वाजताही सुरक्षित फिरू शकतात, असे ते म्हणाले.
गृहमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, गुन्ह्यांसंदर्भातील सांख्यिकीला माझा विरोध होता. आज दिल्ली आणि मुंबईची तुलना केली तर दिल्लीमध्ये १२ वाजता एखाद्या मुलीला सुरक्षित वाटेल का? तसंच मुंबईत वाटते का? मुंबईत आज १२ वाजता मुली सुरक्षित फिरू शकतात. याला सांख्यिकीच्या आधारावर बदनाम केले जाते तेव्हा विश्लेषण करावे लागते, असे फडणवीसांनी म्हटले आहे.
हरवलेल्या मुली, स्त्रिया, अपहरण झालेल्या स्त्रिया यांचा विषय सातत्याने येत आहे. गेल्या दोन आठवड्यांत असे मांडले जात आहे. की हे सरकार आल्यापासून नुसते अपहरणच चालू आहे. पण वस्तुस्थिती अशी नाही. सुप्रिम कोर्टाच्या आदेशामुळे कोणतीही मुलगी घरातून निघून गेली की आपल्याला अपहरण या सदराखाली नोंद घ्यावी लागते. पण त्यांच्या परत येण्याचे प्रमाणही तेवढेच आहे. महाराष्ट्रात सरासरी दरवर्षी चार हजार मुली आणि ६४ हजार महिला बेपत्ता होतात. मविआच्या काळात २०२० मध्ये ४५१७ मुली, आणि ६३ हजार महिला बेपत्ता झाल्या होत्या, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र हे सुरक्षित राज्य
अपहरण आणि हरवलेल्या मुली यांच्या संदर्भात वारंवार चर्चा सुरु आहे. पण यामध्ये परत येण्याचीही संख्या जास्त आहे. ९० टक्के डिटेक्शन आहे तर महिला ८६ टक्के आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे प्रमाण कमी आहे. खुनाच्या गुन्ह्यात प्रती लाख पकडले तर महाराष्ट्र २० व्या स्थानी आहे. खुनाचा प्रयत्न यामध्ये महाराष्ट्र १६ व्या स्थानी आहे. बलात्काराच्या विरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र जे चित्र रंगवले जात तसे नाही. महाराष्ट्र राज्य हे सुरक्षित राज्य आहे, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.