नवी दिल्ली – इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि मतपत्रिकांवरील पक्षचिन्हे हटवली जावीत. त्याऐवजी उमेदवारांची छायाचित्रे, वय आणि शैक्षणिक पात्रता आदींचा वापर केला जावा, अशी मागणी एका याचिकेतून करण्यात आली आहे. त्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
वरिष्ठ वकील अश्विनीकुमार उपाध्याय यांनी संबंधित याचिका दाखल केली आहे. ईव्हीएममधील पक्षचिन्हांचा वापर अवैध, घटनाबाह्य असल्याचा आदेश निवडणूक आयोगाला देण्यात यावा, असा आग्रह याचिकेतून करण्यात आला आहे. राजकारणातील गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचार रोखण्यासाठी मतपत्रिका आणि ईव्हीएमवरील पक्षचिन्हे हटवण्याचे पाऊल सर्वोत्तम उपाय ठरेल. पक्षचिन्हांऐवजी उमेदवारांचे नाव, छायाचित्र, वय, शैक्षणिक पात्रता आदी माहितीचा वापर प्रभावी ठरेल. त्या पाऊलाचे अनेक फायदे आहेत.
मतदार प्रामाणिक, हुशार आणि मेहनती उमेदवारांची निवड करू शकतील. तिकीट वाटपात राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा अनियंत्रित कारभार चालतो. त्यावर मतपत्रिका आणि ईव्हीएमवर पक्षचिन्हे नसल्याने नियंत्रण येईल. जनतेच्या कल्याणासाठी तळमळीने कार्य करणाऱ्यांना उमेदवारी देणे राजकीय पक्षांना भाग पडेल, अशी भूमिका याचिकेतून मांडण्यात आली आहे.