चऱ्होली – उन्हाळ्याची चाहूल दिवसेंदिवस वाढतच आहे. नागरिक तहान आणि दाह शमविण्यासाठी गारवा निर्माण करणाऱ्या रसाळ फळांना प्राधान्य देत आहेत. परिणामी उन्हाळा सुरू होताच रसदार फळांना नागरिकांची मागणी वाढली असल्याची माहिती भोसरी, दिघी येथील फळविक्रेत्यांनी दिली.
उन्हाची तीव्रता आता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उन्हापासून थंडावा देणारी रसदार फळे बाजारात दाखल होऊ लागली आहेत.
सध्या बाजारात सर्वाधिक आवक रसदार फळांची होत आहे. त्यामध्ये कलिंगड व खरबुजाची सर्वाधिक संख्या आहे. तसेच डाळिंब, द्राक्षे, चिकू, पपई, नारळ पाणी, अननस यांनादेखील मागणी आहे. मात्र, यंदाही या फळांच्या किमतीत 10 ते 20 टक्के वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
करोना काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत सजग होता. निरोगी आरोग्यासाठी फळे खाण्यावर भर देण्यास आहारतज्ज्ञ सांगतात. शहराच्या मुख्य भागासह गल्लीबोळातून फळ विक्रेते हातगाडीवर फळे विकताना दिसत असून ग्राहकांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे. उन्हाच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर फळांची विक्री होत असते.
उन्हाळ्याच्या तोंडावरच महागणारी रसदार फळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, अशा दरात साध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिक उन्हाळी फळांच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. शहरात ठिकठिकाणी फळांच्या हातगाड्यांवर फळ विक्री पहायला मिळत आहे.
फळांच्या रसाला नागरिकांची पसंती
विविध फळे खाण्यासह त्यांचा ज्यूस पिण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे वर्षभर फळांचा रस आरोग्यास चांगला असून, तहानही भागवत असल्याने त्याला मोठी मागणी आहे. पावसाळा आणि थंडीच्या दिवसात फळांच्या रसाला फारशी मागणी नसली, तरी उन्हाळा सुरू होताच रसासह रसदार फळांची मागणी वाढलेली आहे. वर्षभर शहरात फळांच्या रसांची दुकाने दिसतात. मात्र, उन्हाळा सुरू होताच त्यांच्या संख्येत भर पडत आहे. या दुकानांमधूनही फळांना मोठी मागणी आहे. घरी फळे खाण्यासह ज्यूस सेंटरमध्ये विविध फळांचे रस पिण्याला नागरिक प्राधान्य देत आहेत.