गरिबी हटाव मोहीम जागतिक पातळीवर हवी
मुंबई – “गरिबी हटाव’ हा कार्यक्रम जागतिक पातळीवरून हाताळण्यात यावा व त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचा नवा आविष्कार निर्माण झाला पाहिजे आणि त्या कामी अधिक वेळ गमावता कामा नये, असा इशारा पंतप्रधान इंदिरा गांधींनी ब्रिटोनिकाच्या वार्षिकासाठी लिहिलेल्या एका दीर्घ लेखात दिला आहे. “गरिबी मुक्त जग’ असा त्या लेखाचा मथळा आहे. हा लेख 800 शब्दांचा असून त्यात इंदिरा गांधी पुढे म्हणतात, “गरिबी मुक्त जग’ हे ध्येय साध्य करावयाचे असेल तर सर्व राष्ट्रांनी आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडणारा धान्यसाठा तयार ठेवण्याचे कामी एकमत केले पाहिजे. राखीव धान्यपेढीही असावी.
स्त्री समानतेसाठी परिणामकारक चळवळ
मुंबई – आज जरी शंभर वर्षांपूर्वीपेक्षा स्त्री बऱ्याच प्रमाणात स्वतंत्र असली तरी, स्त्री-पुरुष समानता पूर्णत्वाने अस्तित्वात येण्यासाठी अजून बरीच प्रगती होणे आवश्यक आहे. वारसा कायदे, तसेच घटस्फोटासंबंधी कायदे अजूनही स्त्रियांना संपूर्ण न्याय देणारे नाहीत म्हणून आंतरराष्ट्रीय महिला वर्षात स्त्रियांना सर्वार्थाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महिलांनी परिणामकारक चळवळी करणे आवश्यक आहे, असे लेखिका सरोजिनी शारंगपाणी यांनी म्हटले.
रशियाचा संरक्षणखर्च अमेरिकेपेक्षा जास्त
वॉशिंग्टन – रशिया अमेरिकेपेक्षा वीस टक्के जादा खर्च संरक्षणावर करीत आहे. म्हणून अमेरिकेने आपले नाविकदल वाढवावे, असे अध्यक्ष जेराल्ड यांनी म्हटले.