रायपूर – छत्तीसगढमधील अगोदरच्या कॉंग्रेस सरकारने राबवलेल्या भर्ती प्रक्रियेत मोठी गडबड झाली असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने सातत्याने केला होता. उमेदवारांनीही २०२१-२२ मध्ये झालेल्या लोकसेवा आयोग भर्ती परिक्षेची चौकशी केली जाण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना निवेदनही देण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे ज्या १५० उमेदवारांची निवड झाली आहे त्यांची मात्र काळजी वाढली आहे कारण आता निवडीनंतर ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत थांबलेले आहेत.
२०२१ मध्ये झालेल्या परिक्षेत गडबड झाल्याचा आरोप झाला होता. मेरीट लिस्टमध्येच फेरफार केली गेल्याचा आरोप तत्कालीन लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांवर करण्यात आला होता. राज्य विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा चांगलाच गाजला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या प्रचार सभेत या भर्ती प्रक्रियेतील गडबडीची चौकशी करण्याची गॅरेंटी दिली होती.
भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक घोषणापत्रातही या आश्वासनाचा समावेश करण्यात आला आहे. आता राज्यात भाजपचे सरकार आले असल्यामुळे लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.