नवी दिल्ली – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. मात्र आता काही ठिकाणी करोनाच्या नवीन रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अनलाॅकची प्रक्रिया सुरु झाली आहे.
राजधानी दिल्लीतही कोरोनाच्या नवीन केसेस कमी झाल्या आहेत. हे पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज हळूहळू दिल्ली अनलॉक करण्याची घोषणा केलीय. जनतेच्या मागणीनुसार आणि तज्ज्ञांच्या मतांच्या आधारे आम्ही हळूहळू लॉकडाऊन उघडण्याची प्रक्रिया सुरू ठेवू, असं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.
केजरीवाल म्हणाले, दिल्लीत कोरोनाची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. गेल्या 24 तासात संसर्ग दर 1.5% झाला आहे आणि कोरोनाची सुमारे 1100 रुग्णांची नोंद झाली आहे. “कोरोनाविरूद्ध लढाईत दिल्लीकरांनी केलेल्या कठोर परिश्रमांमुळे दिल्लीतील परिस्थिती वेगाने सुधारत आहे, लॉकडाऊननंतर दिल्ली हळूहळू अनलॉक करण्यास सज्ज झाल्याचे दिसत आहे. सोमवारी सकाळपासून बांधकाम क्षेत्र व कारखाने सुरू केले जाणार आहेत.
केजरीवाल पुढे म्हणाले, “कोरोना कमी झाला आहे, मात्र, तो नक्कीच संपलेला नाही हे आपल्याला कायम लक्षात ठेवण्याची गरज आहे. म्हणून आम्ही दिल्ली हळूहळू उघडणार आहोत. जेणेकरून एकत्र उघडल्यामुळे संसर्ग पुन्हा वाढू नये. दिल्ली पुन्हा सुरू करताना आम्ही अशा लोकांची काळजी घेतली आहे, जे समाजातील लहान वर्ग आणि गरीब आहेत. ज्यांचं हातावर पोट आहे.
महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत निर्बंध शिथील होण्याची शक्यता –
काल (दि.27) झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 1 जूननंतर लाॅकडाऊन कायम ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, जिथे करोनाच्या केसेस कमी आहेत अशा ठिकाणी सध्या लागू असलेले निर्बंध शिथील केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे 1 जूननंतर महाराष्ट्रात लाॅकडाऊन वाढवला तरी काही ठिकाणी निर्बंध शिथील होण्याची शक्यता आहे.