नवी दिल्ली – कोविड स्थितीच्या हाताळणीबाबत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज एका पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींना अजून कोविड नेमका कळलेलाच नाही.
देशात करोनाची सध्या जी दुसरी मोठी लाट आली आहे त्याला मोदीच जबबादार असल्याची टीका त्यांनी केली आहे. आज देशात अत्यंत संथ गतीने लसीकरणाचे काम सुरू आहे. देशात आत्तापर्यंत केवळ तीन टक्केच लसीकरण झाले आहे. ही गती अशीच राहिली तर देशात कोविडच्या अनेक लाटा येऊ शकतात, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, पहिल्या लाटेचा कोणालाच अंदाज आला नाही, पण दुसऱ्या लाटेला केवळ मोदीच जबाबदार आहेत. त्यांना आपली जबाबदारी पाळता आली नाही म्हणूनच दुसऱ्या लाटेचा फार मोठा फटका देशाला बसला. दुर्दैवाने पंतप्रधान मोदी हे केवळ इव्हेंट मॅनेजमेंट करीत राहिले. कोणत्याही बाबींचा इव्हेंट करणे यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले.
कोविडसारख्या स्थितीत असली इव्हेंटबाजी कामाची नसते. त्यामुळेच या साथीचा फार मोठा फटका देशाने सोसला आहे. मोदींनी या विषाणूच्या साथीकडे साफ दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केला.
लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे हे केवळ तत्कालिक उपाय आहेत. करोनासारख्या महामारीवर केवळ लसीकरण हाच एक खात्रीशीर उपाय आहे असे नमूद करून राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, पण मोदी सरकारकडे अजूनही लसीकरणाच्या संबंधात कोणतेही ठोस धोरण नाही. भारतासारख्या इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात आतापर्यंत केवळ तीन टक्के इतकेच लसीकरण झाले आहे.
भारत सरकारने जर अजूनही लसीकरणाच्या संबंधात ठोस धोरण निश्चित केले नाही तर करोनाच्या या देशात किती लाटा येतील, याची कल्पना करवत नाही असे आपण थेट पंतप्रधानांना नमूद केले होते, असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान हे देशाचे प्रमुख आहेत. देशाचे कल्याण ही त्यांची जबाबदारी आहे. पंतप्रधानांच्या पातळीवरच सारी गडबड होते आहे पण हे कोणी त्यांना सांगण्याचे धाडस करीत नाही. त्यामुळे मोदी सरकारचे हे जहाज पूर्ण भरकटले गेले आहे.
आता पंतप्रधान आपली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण त्यांची ही प्रतिमा पूर्ण लयाला गेली आहे, असेही राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केले. पंतप्रधानांनी आता जागे होऊन देशाचे नेतृत्व करायला हवे, असेही ते म्हणाले. तुम्ही किती चांगले नेते आहात हे सिद्ध करून दाखवण्याची वेळ आली आहे त्यामुळे आता जागे व्हा आणि कामाला लागला अशी सूचनाही त्यांनी केली.
लपवाछपवी न करण्याची मुख्यमंत्र्यांना सूचना –
कॉंग्रेस शासित राज्यांतील आकडेवारी विषयी पत्रकारांनी राहुल गांधी यांना विचारले असता ते म्हणाले की, मी कॉंग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. कोविडविषयीची आकडेवारी लपवण्याने आपण आपलेच नुकसान करून घेत असतो हे मी त्यांना सांगितले आहे, असे ते म्हणाले.
मृतांचे प्रत्यक्ष आकडे दाखवण्याने भीतीचे वातावरण निर्माण होणार असले तरी आपल्याला जी वस्तुस्थिती आहे तीच दाखवली पाहिजे आणि वस्तुस्थिती मान्य करूनच आपल्याला पुढे जावे लागेल असे आपण कॉंग्रेसी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे, असेही राहुल गांधी यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.