नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला करणऱ्या काही गूंडांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांना ताब्यात घेताच या प्रकरणाची उकल होण्याची शक्यता आहे, असे पोलिस दलांतील काही सुत्रांनी सांगितले.
जेएनयुमध्ये रविवारी सायंकाळी काही बुरखेधारी हल्लेखोरांच्या जमावाने विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला होता. त्यात 36 जण जखमी झाले होते. या घटनेचे देशभर संतप्त पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या जेएनयु विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषा घोष हिने या हल्ल्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हात असल्याचे म्हटले होते. अभाविपने हे आरोप फेटाळले होते. यात डाव्या संघटनांचा सहभाग असल्याचा आरोप अभाविपने केला होता.
दरम्यान, मिळालेले व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या आधारे पोलिसांनी तपासास सुरवात केली. त्यांनी यातील काही जणांची ओळख पटवली. मात्र त्यांना अद्याप अटक केली नसली तरी येत्या दोन एक दिवसांत त्यांना अटक करून यामागील सुत्रधारांना गजाआड केले जाईल, असे या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, जेएनयु सेवकांच्या खोलीवर हल्ला करणे आणि दंगल माजवणे याबाबत विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घोष आणि अन्य 19 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केल्याने संताप व्यक्त होत आहे. जे या हल्ल्यात जखमी झाले त्यांच्यावरच गुन्हे दाखल करून पोलिसांना काय साध्य करायचे आहे, असा सवाल केला जात आहे.