– वंदना बर्वे
स्वपक्षातील उठावाचा फायदा नेमका कुणाला होतो? हे तर निकालानंतरच स्पष्ट होईल. पण पशुपती पारस यांच्यावर निकालापूर्वीच कपाळावर हात मारण्याची पाळी आली, असं म्हणायला हरकत नाही.
सध्या सर्वात जास्त जी रंगतदार चर्चा होत आहे ती स्वपक्षात उठाव करणार्या पक्षांची. माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोकजन शक्ती पक्षाचा खरा वारसदार कोण? या मुद्द्यावरून संघर्ष झाला होता. काही लोकांनी जाणीवपूर्वक दोघांमध्ये आग लावून या मुद्द्याला ऑक्सिजन पुरविण्याचे काम केले. यामुळे रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान आणि बंधू पशुपती पारस यांच्यात संघर्ष निर्माण झाला. दोघांनी पक्षाला ताब्यात घेण्यासाठी डावपेच खेळायला सुरुवात केली. जेव्हा हा खेळ खेळला जात होता तेव्हा लोजपाचे सहा खासदार होते. यातील पाच खासदार पशुपती पारस यांच्यासोबत आले. पक्षाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहचला आणि आयोगाने लोजपा पशुपती पारस यांचा पक्ष असल्याचा निकाल दिला. यानंतर चिराग पासवान यांनी बंडखोरी केली. पशुपती पारस यांनी रालोआत राहून आपले मंत्रिपद टिकवून ठेवले. यावेळी पक्षाचे सहा पैकी पाच खासदारही पारस यांच्यासोबत होते. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पशुपती पारस कुठे आहेत? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना आहे.
आता कालचक्र बघा! पशुपती पारस यांचे वासे फिरलेत. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. मात्र, रालोआचा घटक पक्ष असूनही पारस यांच्या पक्षाला एकही जागा दिली गेली नाही. कारण, मुख्यमंत्री नितीशकुमार आणि चिराग पासवान हे दोन्ही नेते रालोआत सामील झाले आहेत. यामुळे, चिराग पासवान यांच्या पक्षाला पाच जागा देण्यात आल्या आहेत. आपल्याला एकही जागा दिली नाही म्हणून पारस यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता मंत्रिपदही नाही आणि घटक पक्ष म्हणून लढायला एक जागाही नाही. आपल्या पायाखालची माती सरकली असल्याचे भान आल्यानंतर पशुपती पारस यांनी राजद प्रमुख लालू यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत सामील होण्याचा इरादा जाहीर केला. पण राजकारणातील चतुरस्र खेळाडू असलेल्या लालू यादव यांनी पशुपतीनाथ पारस यांना जराही भाव दिला नाही. यामुळे महाविकास आघाडीत सामील लोकसभा लढविण्याचा पारस यांचा मनसुबा धुळीस मिळाला.
आता पशुपती पारस यांची परिस्थिती हास्यास्पद झाली आहे. यामुळे त्यांनी पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. पशुपती पारस यांच्यामुळे त्यांचा दुसरा पुतण्या प्रिंस राज यालाही यावेळी तिकीट मिळाले नाही. मात्र, केंद्रातील सत्ताधारी पक्षाने चिराग पासवान यांना पाठिंबा देण्याच्या बदल्यात पशुपती पारस यांना राज्यपालपदाची ऑफर दिली असल्याचे समजते. याशिवाय, प्रिन्स राज यांना बिहार सरकारमध्ये मंत्री केले जाईल असे आश्वासन देण्यात आले असल्याची चर्चा आहे. पण ही ऑफर बाजूला सारून पारस यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि महाआघाडीकडून जागा घेण्यासाठी एनडीएविरोधात वक्तव्ये केली. आता पशुपती पारस आणि त्यांचा पुतण्या प्रिंस राज यांचे निवडणुकीनंतर राजकीय पुनर्वसन कशाप्रकारे होते? की राजकारणाच्या रानावनात त्यांना वनवास भोगावा लागतो? हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल. सध्या तरी पशुपती पारस यांची अवस्था ‘ना इधर के रहे ना उधर के रहे’ अशी झाली आहे.
बिहारमध्ये गाजलेले आणखी महत्त्वाचे एक नाव म्हणजे पूर्णियाचे माजी खासदार पप्पू यादव यांचं. बिहारमधील अत्यंत लोकप्रिय नेते. तरुण वयात अनेकवेळा खासदार आणि आमदार झालेल्या पप्पू यादव यांना त्यांच्या मजबूत प्रतिमेमुळे निवडणूक जिंकण्यात अडचण आली नाही. पप्पू यादव यांची लोकप्रियता एवढी की त्यांनी एकदा जतना दलाचे नेते शरद यादव यांच्यासारख्या दिग्गज नेत्यालाही पराभूत केले होते. पण आता काळ बदलला आहे. आज तेच पप्पू यादव एका तिकिटासाठी मृगजळासारखे इकडे-तिकडे फिरताना दिसत आहेत. अलीकडेच राजद सुप्रीमो लालू यादव यांच्याशी संबंध सुधारण्यासाठी त्यांनी त्यांच्या निवासस्थानीही हजेरी लावली होती. त्यानंतर दिल्ली काँग्रेस मुख्यालयात जाऊन त्यांनी आपला जनाधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पप्पू यादव यांनी काँग्रेसच्या तिकिटावर पूर्णियामधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पण राजकारणाचे चतुर खेळाडू असलेल्या लालूप्रसाद यादव यांनी पप्पू यादव यांना माफ केले नाही आणि पप्पू यादव यांचा गेम केला.
बिहारमधील जागावाटपाच्या वेळी लालू यादव यांनी पूर्णियाची जागा आपल्याच पक्षाकडे ठेवली आणि तेथून जेडीयू आमदार बिमा भारती यांना आरजेडीचे उमेदवार म्हणून घोषित केले. त्यामुळे काँग्रेसला पूर्णियातून पप्पू यादव यांना उमेदवारी देता आली नाही. आता पप्पू यादव काय करणार? हा खरा प्रश्न आहे. सध्या तरी त्यांनी पूर्णिया सोडणार नाही असं स्पष्ट केलं आहे. आपला जीव गेला तरी बेहत्तर पण पूर्णिया सोडणार नाही ही त्यांची भूमिका. आता ते पूर्णियातूनच अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. पप्पू यादव यांच्या वक्तव्याकडे काँग्रेसचे बिहार प्रदेशाध्यक्ष अखिलेश सिंह यांनी दुर्लक्ष केले आहे. पप्पू यादव यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला असला तरी यादव अद्याप काँग्रेसचे सदस्य झालेले नाहीत, असे सिंग यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत ते कोठूनही निवडणूक लढविण्यास मोकळे आहेत. काँग्रेस पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. पूर्णियाचे तिकीट न मिळाल्याने पप्पू यादवची परिस्थितीसुद्धा ‘ना इधर के रहे ना उधर के रहे’ अशी झाली आहे.
मात्र, पप्पू यादव यांनी मागची लोकसभा निवडणूक मधेपुरामधून लढवली होती. येथे त्यांना केवळ 97631 म्हणजेच 8.51 टक्के मते मिळाली होती. तर 2014 मध्ये त्यांनी मधेपुरामधून निवडणूक जिंकली होती. पप्पू यादव यावेळी पूर्णियातून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. पप्पू यादव यांची पत्नी रंजिता रंजन या काँग्रेसच्या राज्यसभा खासदार आणि पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. यापूर्वी त्या सहरसा आणि सुपौलमधून खासदारही राहिल्या आहेत. विकासशील इंसान पार्टीचे अध्यक्ष मुकेश साहनी यांची अवस्थासुद्धा तशीच झाली आहे. एकेकाळी मुंबईच्या चित्रपटसृष्टीत काम करून पैसा कमावणारे मुकेश साहनी कधीच एका जागी टिकले नाहीत. यामुळे बॉलीवूडनंतर त्यांनी बिहारच्या राजकारणाकडे आपला मोर्चा वळविला.
आतापर्यंत त्यांनी अनेक पक्षांशी आघाडी केली. निवडणूक लढले पण जिंकले एकदाही नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत ते एनडीएत सामील झाले आणि त्यांनी 13 जागांवर उमेदवार उभे केले. यातील चार जागा त्यांनी जिंकल्या. यानंतर नितीशकुमार यांच्या सरकारमध्ये साहनी यांना मंत्री करण्यात आले. मात्र स्वभावानुसार ते जास्त काळ युतीत राहू शकले नाहीत. मग त्यांचे काही आमदार फुटले आणि ते भाजपात सामील झाले. आता त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळही पूर्ण झाला आहे. आता ते आघाडीत सामील होऊन लोकसभा लढविण्याच्या तयारीत आहेत. परंतु, महाविकास आघाडी किंवा रालोआने त्यांना फारसे महत्त्व दिले नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणखी कुणकुणावर घरी बसण्याची वेळ येते? हे तर निकालच सांगू शकेल!