‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ इलॉन मस्क भारतात येणार होते. बराच गाजावाजा झाला. अचानक त्यांची भारतभेट लांबणीवर (म्हणजे रद्द झाली) गेली. घोषित भारत दौरा बारगळला आणि जो अघोषित होता त्या चीन दौर्याला त्यांनी प्राधान्य दिले. का आणि कशासाठी ते तिकडे गेले हे सार्वजनिक केले नाही. तेथे त्यांनी चीनच्या पंतप्रधानांची भेट घेतली अन् अनेक अधिकार्यांशीही चर्चा केली. एकीकडे टेस्ला भारतात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याच्या बर्याच महिन्यांपासून चर्चा आहेत. तथापि, चीनला ही बाब रूचली नसल्याचेही म्हटले जाते. चीनच्या एका सरकारी माध्यमाने तर त्यांच्या पोटात आहे तेच ओठातही आणले.
भारतात गेल्यावर मस्क बरबाद होतील. त्यांच्या सध्याच्या गाड्यांसाठी आणि भविष्यातील गाड्यांसाठी जे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर गरजेचे आहे, ते भारतात नाही, असे चिन्यांचे म्हणणे आहे. 21 आणि 22 एप्रिल रोजी मस्क भारतात येणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची चर्चा होणार असल्याचेही जाहीर केले गेले. या संभाव्य भेटीच्या अनुशंगाने बरीच हवा गरम केली गेली. अचानक मस्क यांनी भेट लांबणीवर टाकली. या वर्षातच आपण भारताला भेट देणार असल्याचे सांगत त्यांनी मधाचे बोट चाटवण्याचा प्रयत्न केला. या विषयाला अनेक कंगोरे आहेत. त्याला राजकीय आणि व्यावसायिक संदर्भही आहेत. स्वत: मस्क यांची ठाम आणि सिलेक्टिव्ह वैचारिक बैठकही यामागे असू शकते. शेवटी ते एक व्यापारी आहेत. उद्योजक आणि व्यावसायिक लोक भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाहीत. त्यांच्या सगळ्या भावना नफा-तोट्याशी निगडीत असतात. त्यानुरूप मस्क यांनी चीनला प्रथम पसंती दिली.
चीन आज जगातले दुसर्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे वाहन मार्केट आहे. मस्क यांची टेस्ला कंपनी खूप पूर्वीपासून चीनमध्ये कार्यरत आहे. तेथे त्यांना आता अलीकडच्या काळात काही समस्यांचा म्हणजे आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. टेस्लाला चीनमध्ये पूर्णत: सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअर अर्थात ‘एफएसडी’ लाँच करायचे होते. चीनमध्ये त्यांनी जो डेटा गोळा केला आहे तोही मस्क यांना परदेशात ट्रान्सफर करायचा आहे. डेटा ऑटोनॉमस ड्रायव्हींग टेक्नॉलॉजीशी (स्वयंचलित) संबंधित आहे. मात्र याच ठिकाणी मस्क यांचे हात अडकले आहेत. टेस्ला आपल्या ऑटोपायलट तंत्रज्ञानाच्या सगळ्यात अत्याधुनिक आवृत्तीवर सध्या काम करते आहे. हे तंत्रज्ञान अमेरिकेत अगोदरच गेल्या चार वर्षांपासून उपलब्ध आहे. चीनमध्ये मात्र अद्याप ते लाँच करण्यात आले नाही.
याच कारणामुळे टेस्लाने चीनमध्ये जो डेटा आणि आकडे गोळा केले आहेत ते त्यांना बाहेर नेण्यास चीनची मनाई आहे. चीनच्या स्थानिक कंपन्यांकडूनही टेस्लाला आव्हान निर्माण झाले आहे. त्यांनी मस्क यांची डोकेदुखी अगोदरच वाढवली आहे. त्या देशात गेल्याच आठवड्यात एक ऑटो शो सुरू झाला आहे. तो 4 मे पर्यंत चालणार आहे. यातली चमत्कारिक बाब म्हणजे या शो मध्ये टेस्लाला बूथ किंवा जागा दिली गेली नाही. ‘चायना फर्स्ट’ या चीनच्या धोरणानुसार अगोदर आपल्या लोकांना प्राधान्य हा त्यामागचा त्यांचा हेतू असावा. एक व्यावसायिक म्हणून या पार्श्वभूमीचा विचार केला तर मस्क यांच्या चीन प्रेमाचे धागे उलगडतात. भारत हा मस्क यांच्या प्राधान्य यादीत नसणारच किंवा आजपर्यंत नसेलच. पण भविष्यातला विचार करूनच व्यावसायिकांची पावले पडत असतात.
भविष्यातील भारतीय बाजारपेठ त्यांना खुणावत नसेल तरच नवल. चीनच्या पंतप्रधानांशी म्हणजे लि कियांग यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मस्क यांनी म्हटले की, चीनसोबतचे सहकार्य वाढवण्याची त्यांची इच्छा आहे. कियांग यांनीही परदेशी कंपन्यांसाठी त्यांची दारे कायम खुली असल्याचे डिप्लोमॅटीक उत्तर दिले. इलेक्ट्रिक व्हेइकलचे अर्थात ‘ईव्ही’चे चीन सगळ्यात मोठे मार्केट आहे. चिनी कंपन्यांकडून पक्षपातीपणे मिळणार्या आव्हानाचा सामना करत टेस्लाला हे मार्केट सांभाळायचे आहे. त्याकरता आपल्या किमतीही त्यांनी घटवल्या आहे व आता स्वयंचलित वाहनांवर त्यांना अधिक फोकस ठेवायचा आहे. आतापर्यंतची गुंतवणूक आणि बाजारपेठ म्हणून चीनला असलेले महत्त्व या बाबी ध्यानात घेता टेस्लाला चीनमधील डोलारा सांभाळायचा असेल, तर चीनच्या सरकारकडून अभय असणे क्रमप्राप्त आहे.
जरी काही औपचारिक घोषणा मस्क-कियांग भेटीनंतर झाली नसली, तरी काही बाबींवर दोन्ही पक्षांत सहमती झाल्याचा दावा पाश्चात्य माध्यमांनी केला आहे. आज युक्रेन-रशिया युद्ध आणि इतर अनेक जागतिक विषयांवर अमेरिका आणि चीनचे मतभेद आहेत. अगदी अलीकडेच ‘टिकटॉक’वर बंदीबाबत अमेरिकेने चिनी कंपनीला दिलेला निर्वाणीचा इशाराही ताजा आहे. मस्क यांचे जगाच्या बाबतीत एक तर चीनच्या बाबतीत वेगळे धोरण असते, हेही गेल्या काही काळात त्यांच्या विधानांवरून समोर आले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य अथवा तत्सम विषयांवर विकसनशील देशांबाबत ते धडक भूमिका मांडतात. चीनच्या संदर्भात यातले काही बोलत नाहीत. या सगळ्याची गोळाबेरीज एकच आहे की, मस्क एक लाभाचा विचार करणारे उद्योजक आहेत व त्यांना चीनमध्ये अजूनही फायदा दिसतो आहे. भारताची मोठी बाजारपेठ त्यांना खुणावते आहे. पण चीनच्या तुलनेत आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करता भारत अजूनही त्यांना लहान भासतो आहे. इलेक्ट्रिक व्हेइकलचा भविष्यातील विचार करता त्यांना फार काळ भारताकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि ते तसे करणारही नाहीत.