दिग्गज नेत्यांना वगळून देवेंद्र फडणवीस यांनी चार वेगळे चेहरे समोर आणले. यावरून आगामी राजकारणाची दिशा चाचपडत त्यांनी आपली गट बांधणी सुरू केली असल्याचे मानण्यास वाव आहे.
करोना नावाच्या विषाणूनं अख्ख्या जगात हाहाकार माजविला असला तरी महाराष्ट्रातील राजकारणाचं त्याला काहीही करता आलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. देशावर अस्मानी कोसळलं आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तरी राजकारणावर त्याचा काहीही प्रभाव पडत नाही एवढं नक्की! सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे महाराष्ट्रातील राजकारण. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वजण या राजकारणाने ग्रासलेले आहेत. सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी ठाकरे आमदार होणार की नाही? असा यक्षप्रश्न निर्माण झाला होता, असो.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या या निवडणुकीनं भाजपातील दिग्गज नेत्यांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला आहे. यात सर्व मूळ भाजपचेच आहेत असं नव्हे तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेल्यांचाही समावेश आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने चार तरुण चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. यात प्रवीण दटके, रणजीतसिंग मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर आणि डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे. मुळात, माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. याशिवाय माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांनाही उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, भारतीय जनता पक्षानं सर्वांच्या अपेक्षांवर विरजण टाकलं.
खरं म्हणजे, भाजपातील उपेक्षित नेत्यांची यादी ही हनुमानाच्या शेपटीप्रमाणे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सहा-सहा माजी मंत्र्यांशिवाय टीव्हीच्या डिबेटमध्ये तुफान बॅटिंग करणारे माधव भांडारी आणि केशव उपाध्ये यांच्या नावाचाही समावेश करावा लागेल. भारतीय जनता पक्षात हीच मंडळी दुःखी आणि उपेक्षित आहेत असं नव्हे. प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे. दस्तुरखुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अस्वस्थ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वात जास्त 105 आमदार असलेला पक्ष असूनही भाजप विरोधकाच्या बाकावर बसून आहे. नशिबाने थोडी मदत केली आणि दिल्लीचं सहकार्य मिळाल्यामुळे भल्या पहाटे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, हे पद औटघटकेचं ठरलं. सोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार हे ठाकरे मंत्रिमंडळातही उपमुख्यमंत्री आहेत. हे बघून वाईट वाटत नसेल तर नवलच!
भाजपचे चाणक्य अमित शहा ते महाराष्ट्रातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मंडळीला शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या रुपात धोबीपछाड दिला. लोकसभा निवडणूक 2014 पासून भारतीय जनता पक्ष मोठ्या वेगाने राजकीय घोडदौड करतो आहे. प्रचाराचे आणि राजकारणाचे नवनवे फंडे वापरत भाजपचा विजयवारू चौखूर उधळत आहे. अशा या चौखूर उधळलेल्या भाजपच्या वारूला शरद पवार यांनी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रीय कॉंग्रेसच्या रुपात महाविकास आघाडी स्थापन करून लगाम लावला. राजकीय वर्तुळात शरद पवार यांच्या या प्रयोगाची भारतभर चर्चा झाली.
भाजपला रोखता येऊ शकते हा संदेश या निमित्ताने देशभर गेला. इथेच नेमकी मेख आहे. यात किंचितही दुमत नाही की, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष एकजूट झाले आहेत. परंतु, भिन्न विचारधारा असलेल्या पक्षांच्या महाविकास आघाडीकडे नवा प्रयोग या दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे. हा प्रयोग यशस्वी झाला तर देशात जाती आणि धर्माचं राजकारण बाजूला पडेल आणि विकास केंद्रस्थानी येईल.
भाजप आमदारांची संख्या 105 आहे. दहा-बारा अपक्ष आमदार सोबतीला होते. 288 सदस्यांच्या विधानसभेत बहुमताचं सरकार स्थापन करण्यासाठी आणखी तीस आमदारांची जुळवाजुळव करावी लागली असती. भाजपनं या किरकोळ गणिताच्या भानगडीत पडण्यापेक्षा 54 आमदारांच्या राष्ट्रवादीलाच सोबत घेण्याची योजना आखली होती. विरोधकांच्या बाकावर बसावे लागत असल्याने भाजपचे नेते दुःखी आहेत, या मुद्द्यावर भाजपात दोन गट आहेत. पहिला गट आहे तो मूळ भाजप नेत्यांचा तर दुसरा गट आहे कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्या भाजपवासी नेत्यांचा. फडणवीस यांचं दुसरं सरकार जेव्हा कोसळलं तेव्हा भाजपातील अनेकांना मनातून आनंद झाला असेल.
याच घटनेचं सर्वात मोठं दुःख झालं असेल ते दुसऱ्या गटाला. यात ज्यांचा समावेश होतो त्यात आघाडी सरकारमधील माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. भाजपमध्ये येऊन आपला पक्ष सोडला नसता तर आज उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये आपला काय रूबाब असता? या विचाराने भाजपवासी कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आजही सुखावत असतील.
देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील वयाच्या दृष्टीने विचार करता एकदम तरुण. फडणवीस यांनाही त्याची जाण आहे. त्यामुळे आपल्याला राजकारणात चांगले भविष्य असू शकते हे फडणवीस ओळखून नसतील तरच नवल. मात्र, संघटनात्मक पातळीवर विचार करता फडणवीस यांचा स्वतःचा असा प्रभावी गट नाही. विधान परिषदेच्या निमित्ताने हा गट बाधण्यास फडणवीस यांनी सुरुवात केली असे म्हणायला हरकत नाही. कारण विधान परिषदेसाठी चार उमेदवारांची नावे पाहता हे सर्व उमेदवार एकतर फडणवीस यांनी भाजपात आणले आहेत किंवा ते स्वतः फडणवीस यांच्या जवळचे आहेत. आपल्या पाठीमागे आमदार, खासदारांचे पाठबळ नसेल तर केवळ पक्षाच्या जीवावर राजकारण करणे सोपे नसते.