नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पाचव्यांदा ईडीसमोर हजर राहणे टाळले. चौकशीसाठी ईडीकडून बजावण्यात येणारे समन्स अवैध असल्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. दिल्लीतील मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीला केजरीवाल यांची चौकशी करायची आहे.
त्यासाठी त्या केंद्रीय यंत्रणेने याआधी केजरीवाल यांना चार समन्स बजावले. मात्र, चारही वेळा ते हजर न राहिल्याने ईडीकडून पाचव्यांदा समन्स बजावण्यात आले. त्यानुसार, केजरीवाल यांना शुक्रवारी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते पुन्हा ईडीसमोर गैरहजर राहिले. त्यावरून आप आणि भाजपमधील शाब्दिक युद्धाचे सत्रही चालूच राहिले.
केजरीवाल यांना अटक करवून दिल्ली सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे. मात्र, आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया आपकडून देण्यात आली. त्यानंतर भाजपने आपवर पलटवार केला. केजरीवाल यांना ईडी बजावत असलेले समन्स अवैध वाटत असेल; तर आपने न्यायालयात जाऊन ते रद्दबातल करून घ्यावे. भ्रष्टाचार घडल्याचे ठाऊक असल्याने केजरीवाल ईडी चौकशी टाळत आहेत, असा प्रत्यारोप भाजपने केला.