मुंबई – महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेऊन त्यांना विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सादर केला. त्यावर कायदेशीर बाबी तपासून उद्या सांगतो, असे आश्वासन त्यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे. यामुळे राज्यपाल उद्या काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याबाबत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन देण्यात आले. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ही निवडणूक या दोन दिवसांमध्ये पार पडावी, यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली. राज्यपालांनी सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करून उद्या निर्णय कळवणार असल्याचे सांगितल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. राज्यपाल सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यपालांनी जे पत्र दिले होते सरकारला निवडणुकीबाबत, त्या अनुषंगानेच मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले पत्र आम्ही त्यांना दिले. येत्या दोन दिवसांत ही निवडणूक व्हावी, अशी आम्ही मागणी केली. त्यांची भूमिका सकारात्मक आहे. या बाबतीत कायदेशीर चर्चा करुन यावर उद्या निर्णय कळवतो, असे त्यांनी म्हटले.
“विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना दिला. त्यांनी लवकर मंजूरी द्यावी, यासाठी त्यांची भेट घेतली. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम उद्याच जाहीर करावा, अशीही त्यांना विनंती करण्यात आली. ते हा कार्यक्रम मंजूर करतील अशी आम्हाला खात्री आहे. बिगर अध्यक्षांची विधानसभा कशी चालेल? त्यामुळे ते मान्यता देतील, असा विश्वास आहे.”
– बाळसाहेब थोरात