हायब्रीड दहशतवाद्यांना हे समजायला पाहिजे की, अशा दहशतवाद्यांचे आयुष्य फार तर तीन ते सहा महिने एवढेच असते. त्यानंतर ते नक्कीच मारले जातात.
पाकिस्तानस्थित दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये हायब्रीड दहशतवाद्यांच्या साथीने सामान्य नागरिक, नि:शस्त्र पोलीस, काश्मिरी हिंदूंचे टार्गेट किलिंग होत आहे. गुप्तचर आणि सुरक्षायंत्रणा आता या हायब्रीड दहशतवाद्यांची यादी तयार करत आहेत. शोपियानमध्ये परप्रांतीय मजुरांच्या हत्येमध्ये याच दहशतवाद्यांचा हात आहे. हायब्रीड दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोधमोहिमा राबवल्या जात आहेत. सुमारे 600हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दले सज्ज झाली आहेत.
हायब्रीड दहशतवाद्यांची भूमिका गेल्या दहा महिन्यांत उघड झाली आहे. यापूर्वी असे दहशतवादी हे छुपेपणाने दहशतवाद्यांना मदत होते. मात्र, आता ते थेट दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होत आहेत. गेल्या दोन वर्षांत डझनभर प्रॉक्सी दहशतवादी संघटना तयार झाल्या आहेत. या सर्व संघटना, विदेशी दहशतवाद्यांना सतत मदत करत आहेत. हे दहशतवादी स्थानिक हायब्रीड दहशतवाद्यांच्या साथीने हिंसक कारावाया करत आहे.
जम्मू-काश्मीरमधील मजुरांवर ग्रेनेड फेकणारा दहशतवादी इम्रान बशीर गनी याला जिवंत पकडण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात उत्तर परदेशातील दोन मजूर ठार झाले. काही दिवसांपूर्वी शोपियानमध्ये एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्याही करण्यात आली होती. 15 ऑक्टोबर रोजी दक्षिण काश्मीर जिल्ह्यात राहणारे काश्मिरी पंडित पूरणकृष्ण भट यांची त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
हायब्रीड दहशतवाद म्हणजे काय?, हायब्रीड दहशतवादी आले कुठून? हायब्रीड दहशतवादी कोणाला म्हणायचे? हायब्रीड दहशतवादी कोणाला लक्ष्य करतात आणि का करतात? या दहशतवाद्यांचा हेतू काय असतो? दहशतवादी संघटनांसाठी “हायब्रीड दहशतवादी’ का सोयीचे आहेत?हायब्रीड दहशतवादाला कसे रोखायचे, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येतात.
जे दहशतवादी काही दिवसच आधी दहशतवादी गटाचा भाग बनले होते. काही प्रकरणांमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याच्या कुटुंबीयांनाही माहिती नसते किंवा त्यांचा विश्वास बसत नाही की त्यांच्या मुलांनी दहशतीचा मार्ग स्वीकारला आहे आणि शस्त्रेही उचलली आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी अशा दहशतवाद्यांना “अ सूचीबद्ध दहशतवादी’ या गटात ठेवले. कारण या दहशतवाद्यांच्या नोंदी पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये कुठेच नाहीत.
“हायब्रीड दहशतवादी’ पद्धतीत शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवायांत आणले जाते. ते त्यांना नेमून दिलेल्या लक्ष्यावर हल्ला करतात आणि काम झाले, की पुन्हा आपले सामान्य जीवन जगतात. “हायब्रीड दहशतवादी’ म्हणजे असे दहशतवादी जे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये नाहीत; परंतु छुप्या पद्धतीने दहशतवादाशी संबंधित आहेत. “हायब्रीड दहशतवादी’ हे असे दहशतवादी असतात जे हल्ले करून पुन्हा सामान्य जीवनात परत जातात. हे दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी दहशतवादी बनतात. “हायब्रीड दहशतवादी’ आणि स्लीपरसेल्स यांच्यात साम्य वाटू शकते; पण स्लीपरसेल्स अनेक वर्षे एकाच ठिकाणी राहून आदेशाची वाट पाहतात, तर हायब्रीड दहशतवादी हे वेळोवेळी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होतात.
फेब्रुवारी 2021पासून त्या दहशतवाद्यांना सुरक्षादलाने “हायब्रीड’ या नव्या शब्दाने संबोधण्यास सुरुवात केली. श्रीनगरच्या प्रसिद्ध कृष्णा ढाब्याच्या मालकाच्या मुलावर दोन अज्ञात तरुणांनी हल्ला करून त्याचा खून केला होता; पण या हल्लेखोरांची पोलिसांकडे कोणतीही नोंद नव्हती. पोलिसांनी त्यांचा “हायब्रीड दहशतवादी’ असा उल्लेख केला. काश्मीरमध्ये मागील 20-22 महिन्यांत झालेल्या 55 नागरिकांच्या हत्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक घटनांसाठी सुरक्षादलाने या हायब्रीड दहशतवाद्यांना जबाबदार ठरवले आहे आणि ज्यामध्ये तरुणवर्गाचा समावेश आहे.
असे दहशतवादी निर्माण करण्यासाठी सर्वात अगोदर त्यांचे ब्रेनवॉश केले जाते. ज्यांना कट्टर बनवले जाते.धर्म आणि द्वेषाच्या नावावर त्यांना काहीही करण्यासाठी तयार केले जाते. त्यानंतर त्यांना गुप्तरित्या शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. हे दहशतवादी त्यांना सोपवलेलं काम करताना सामान्यपणे जीवन जगत असतात, पण आतून दहशतवाद्यांना सामील असलेले आणि प्रसंगी दहशतवादी कारवायांतही सहभागी होणारे दहशतवादी असतात, ज्यामुळे सुरक्षायंत्रणांना त्यांना शोधणे कठीण जाते. ज्यांच्या नावाची दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये फारशी नोंद नाही. ते त्यांच्या पहिल्या कामगिरीनंतर दहशतवादी बनतात. त्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि असे काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
दहशत पसरवणे आणि दहशतवाद व त्यांच्या इकोसिस्टमला लक्ष्य करणारे व्यवसाय व सामाजिक कार्य थांबवणे हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. फुटीरतावादी, हिंसाचारी आणि भडकावणाऱ्यांच्या विरोधात उठणारा आवाज ते बंद करतत. त्यांचा शोध घेणं कठीण आहे. ते नेमके कोण आहेत हे माहीत नसते, अन्य दहशतवाद्यांपेक्षा ते वेगळे आहेत.
या दहशतवाद्यांसाठी सामान्य नागरिक “सॉफ्ट टार्गेट’ असतात. सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला, तर प्रत्युत्तरात दहशतवाद्याचा मृत्यू होऊ शकतो; पण नागरिकांवर हल्ला करून ते सहज फरारी होऊ शकतात. या हल्ल्यांमागे फक्त दहशत माजवण्याचे उद्दिष्ट असते. “हायब्रीड दहशतवादी’ने पहिला हल्ला केल्यापासून पुढील 3 ते 6 महिन्यांत त्याचा सुरक्षा दलांकडून खात्मा केला गेला आहे. मात्र, अजूनसुद्धा त्यांची जागा घेणारे दहशतवादी मिळत असतात.
दुर्लक्षामुळेच मुले दहशतवादाकडे?
या दहशतवादांकडून होणारे हल्ले पूर्वनियोजित असतात. म्हणून अत्याधुनिक सर्विलांस सिस्टमने त्यांच्यावर लक्ष ठेवले जाऊ शकते. हे लोकल दहशतवादी असल्यामुळे हल्ला झाल्यानंतर त्यांना ओळखणे सोपे असते. हायब्रीड दहशतवादी यांच्याकडून होणारे हल्ले रोखण्यात त्यांच्या कुटुंबीयांची भूमिका काय असते, त्यांना याची कल्पना आहे का, की मुलांचा दहशतवादाकडे कल वाढला आहे. पालकांचे आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. मुले दहशतवादाकडे वळताना त्यांचे वर्तन बदलत असते. हे बदललेले वर्तन पालकांच्या लक्षात आले नाही, की मुले गैरमार्गाला लागतात. आजूबाजूची मंडळी, नातेवाईक हे बदललेले वर्तन हेरण्यात चुकतात. त्यामुळे जबाबदार पालकांनी लवकरात लवकर या गोष्टी हेरून त्याची पोलिसांना कल्पना देण्याची गरज आहे.