चिनी प्रायव्हेट कंपनीज आणि चिनी सिक्युरिटी कंपनीज म्हणजे काय? त्यांचा वापर का केला जातो? चिनी सिक्युरिटी कंपनीचा प्रभाव आपल्या शेजारी राष्ट्रात कमी करण्याकरता भारताने काय करावे? याबाबत…
अमेरिका, रशिया, चीन यासारख्या बलशाली राष्ट्रांना युद्धामध्ये किंवा युद्धजन्य व धोकेदायक परिस्थितीमध्ये आपल्या सैनिकांचे झालेले मृत्यू आवडत नाही. त्या देशातील जनता सरकारवर दबाव टाकते की असे मृत्यू व्हायला नकोत. अमेरिकेने अफगाणिस्तानच्या युद्धातून माघार घेतली कारण तिथे गेल्या वीस वर्षांमध्ये त्यांचे 4500 हून जास्त सैनिक मारले गेले होते, चौपट सैनिक जखमी झाले होते; परंतु अनेकांना हे माहिती नाही की, त्यांच्या प्रायव्हेट मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीजच्या मृत्यूमुखी पडलेल्या रिटायर्ड सैनिकांची संख्याही 4500 हून जास्त आहे. म्हणजेच प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज तैनात केल्यामुळे अमेरिकेच्या सैनिकांची हानी कमी झाली, ते सैनिक कमी गंभीररित्या जखमी झाले, काही सैनिक युद्धकैदी बनले.
प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनी किंवा भाडोत्री सैनिकांनी अनेक युद्धांमध्ये आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये काम केलेले आहे. अमेरिकेच्या प्रायव्हेट मिलिट्री कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ब्लॅकवॉटर, रशियाच्या प्रायव्हेट मिलिट्री कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे वॅगनर ग्रुप आणि इतर या विषयी पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. परंतु चिनी प्रायव्हेट मिलिटरी कंपनीज किंवा चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.
आज चीन शेकडो देशांमध्ये बेल्ट आणि रोडच्या नावाखाली रस्ते बांधत आहे, सुविधा निर्माण करत आहे, खाण काम करत आहे आणि वेगवेगळे कारखाने चालवत आहे, जिथे हजारो, लाखो चिनी नागरिक काम करत आहे. मात्र करोना आणि त्यानंतर केलेल्या चिनी आक्रमक कारवायांमुळे जगातले बहुतेक देश आणि त्यांचे नागरिक चिनी विरोधात गेले आहेत आणि जगामध्ये अनेक ठिकाणी चिनी नागरिकांवरती प्राणघातक हल्ले झाले आहेत आणि होतच राहतील. खास तर अफगाणिस्तानमध्ये आणि पाकिस्तानात. म्हणून या प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीची गरज पडते. कारण चीनचा तिथे असलेल्या पोलीस किंवा सैन्यदलाच्या क्षमतेवर फारसा विश्वास नाही.
सिक्युरिटी कंपनीचा वापर केल्यामुळे चीनला अनेक फायदे होतात. पहिले चिनी लोकांना कळत नाही की त्यांचे सैनिक तिथे तैनात झाले आहे, त्यामुळे जनतेकडून विरोध होत नाही. दुसरे जागतिक स्तरावरती कोणीही म्हणू शकत नाही की चिनी सैन्याने दुसऱ्या राष्ट्रांमध्ये प्रवेश केला आहे. प्रत्येक देशाचे कायदे असतात आणि ते आपल्या देशात बाहेरच्या सैनिकांना काम करण्याकरता परवानगी देत नाहीत.आंतरराष्ट्रीय कायद्यांचासुद्धा भंग होत नाही. चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज 40-50 देशांमध्ये काम करत आहे. 2009साली अशा प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीच्या उपयोगाकरिता कायदेशीर परवानगी चीनने दिली आणि त्यानंतर त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीजना कायदे, नियम लागू नसतात, त्यामुळे ते बिनधास्तपणे काम करू शकतात. काहीवेळा आंतरराष्ट्रीय कायदे इतर देशांमध्ये किंवा समुद्रामध्ये सैन्याचा वापर करायला परवानगी देत नाही. त्यावेळेलासुद्धा या प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनी अत्यंत उपयोगी पडतात. एवढेच नव्हे तर पारंपरिक सैन्याच्या तुलनेत प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज या कमी खर्चात काम करतात. कारण त्यांना सर्वकाळ तिथे तैनात करण्याची गरज नसते. काम झाले की त्यांना तिथून बाहेर पाठवता येते. असे अनेक फायदे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चीन प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीजचा वापर करत आहे. असे मानले जाते की चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज 40-50 देशांमध्ये काम करत आहे. यामध्ये काम करणारे कर्मचारी मुख्यतः पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजे चिनी सैन्याचे रिटायर झालेले सैनिक आणि अधिकारी आहेत. ते मध्य आशिया, आफ्रिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान अशा अनेक देशांमध्ये काम करत आहे. त्यामुळे अशा भागांमध्ये चिनी प्रभाव वाढत आहे. एका अंदाजाप्रमाणे सध्या 5200 चिनी सेक्युरिटी कंपनी काम करत आहे, ज्यामध्ये 40 लाख रिटायर सैनिकांना तैनात करण्यात आले आहे.ही जगातील सर्वात जास्त रिटायर्ड सैनिक तैनाती असावी.
चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीजचे भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये प्रवेश हे नक्कीच भारताकरता धोकेदायक आहे आणि या विरूद्ध पावले उचलली पाहिजे. भारताने चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीजचा मुकाबला कसा करावा? अर्थात युद्धपरिस्थितीमध्ये त्यांचे हल्ला करून नुकसान केले जाऊ शकते, मात्र, शांतता काळात नेमके काय करायचे? सर्वात प्रथम चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीवरचे संशोधन चालू ठेवावे आणि त्यांनी केलेल्या गैरकृतीची माहिती जगाला देत राहावे. दुसरे देशांमध्ये या प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज काम करत आहे त्या देशांना चीनचा विरोध करायला सांगावे. त्यांना सांगावे की तुमच्या पोलिसांना, तुमच्या सैनिकांना आम्ही प्रशिक्षित करू, ज्यामुळे तुमच्या देशात संरक्षण तुम्हीच करू शकाल, त्याकरता चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीजची गरज पडणार नाही. ही मदत दहशतवादी हल्ले थांबवायचे ट्रेनिंग देण्याकरता, अफू-गांजा-चरस दहशतवाद थांबवण्याकरता दिले जाऊ शकते. याशिवाय गुप्तहेर माहिती कशी काढायची, त्याचा वापर कसा करायचा, असेसुद्धा प्रशिक्षण दिले जाऊ शकते.
जिथे चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज किंवा चिनी नागरिक आहेत, ते तिथल्या देशांच्या नागरिकांशी गैरवर्तणूक करतात. ते आक्रमकपणे त्यांच्यावरती हल्ले करतात. अशाप्रकारचे हल्ले पाकिस्तानी सैन्यावरसुद्धा चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेले आहेत. अफगाणिस्तानमध्ये सुद्धा ते अतिशय आक्रमकरित्या वागत असतात. जिथे चिनी राहतात त्या भागांमध्ये इतर सामान्य नागरिकांना येण्याची परवानगी नसते उदाहरणार्थ, ग्वादर बंदरांमध्ये आसपासच्या समुद्रामध्ये स्थानिक मच्छीमारांना मासेमारी करण्याकरता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीजचे कटकारस्थान त्या त्या राष्टाच्या समोर वेळोवेळी मांडले पाहिजे, ज्यामुळे त्यांचा प्रभाव कमी करण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.