– संजय साताळकर
ही आठवण आहे साधारण 2015 सालातील. मी रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबागचा सदस्य म्हणून काम करीत होतो. साधारण पाच वर्षांपूर्वी आम्ही काही समविचारी आणि समाजकार्याची आवड असलेले काहीजण एकत्र येऊन ह्या क्लबची स्थापना केली होती. रोटरीच्या शंभराहून अधिक वर्षांपेक्षा जास्त इतिहासाच्या मानाने आम्ही अगदीच नवखे होतो. पण समाजासाठी काहीतरी विधायक कार्य करण्याची ऊर्मी प्रत्येकात होती. ह्यादरम्यान आमची रोटरी क्लब ऑफ पूना डाऊन टाऊनमधील काही वरिष्ठ सभासदांशी ओळख झाली. डाऊन टाऊन क्लब हा एक जुना आणि अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबवणारा एक प्रतिथयश क्लब आहे. आमच्या भेटी दरम्यान त्यांनी हात नसलेल्या अपंगांना कृत्रिम हात बसवण्याच्या एका प्रकल्पाबद्दल माहिती सांगितली. डाऊन टाऊन सदस्य गेली काही वर्षे भारतभर फिरून स्वखर्चाने हा प्रकल्प राबवित होते. ह्या प्रकल्पासाठी त्यांना इलन मेडॉस फाउंडेशन ह्या अमेरिकेतील एका सामाजिक संस्थेची मदत होत होती.
अमेरिकेतील इंडस्ट्रीयल डिझायनर एरिन मेडॉस आणि त्यांच्या पत्नी मार्ज ह्यांनी ह्या फाउंडेशनची स्थापना केली होती. एका कार अपघातात ह्या जोडप्याच्या अठरा वर्षांच्या इलन नावाच्या तरुण मुलीचे दुर्दैवी निधन झाले होते. तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ एरिन ह्यांनी आपले कसब पणाला लावून “एलएन 4′ नावाच्या एका अत्याधुनिक कृत्रिम हाताची निर्मिती केली होती. फक्त चारशे ग्रॅम वजनाचा हा कृत्रिम हात बसवायला आणि वापरायला अतिशय सोपा होता. बाजारात उपलब्ध असलेले इतर कृत्रिम हात एकतर खूप महाग होते आणि जड असल्यामुळे वापरायला अवघड होते. त्यामुळे हलक्या वजनाचा, टिकाऊ “एलएन4′ कृत्रिम हात हे अपंगांसाठी एक वरदानच होते. इतकेच नव्हे तर हे कृत्रिम हात इलन मेडॉस फाउंडेशनतर्फे रोटरीमार्फत जगभर मोफत दिले जात होते.
डाऊन टाऊनच्या सदस्यांनी आम्हाला प्रकल्पाची जबाबदारी पुण्यामध्ये घेण्याची विनंती केली. आमच्या रोटरी क्लबचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा ह्यांनी ही विनंती ताबडतोब मान्य करून माझी प्रकल्प प्रमुख म्हणून नेमणूक केली.
सर्वप्रथम कृत्रिम हात जोडण्याच्या शिबिराची तारीख, वेळ व ठिकाण निश्चित करणे जरुरीचे होते. शिबिरासाठी लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांच्यासाठी “एलएन4′ हाताची मागणी नोंदवून हे सर्व कृत्रिम हात शिबिराच्या तारखेच्या आत ताब्यात घेणे जरुरीचे होते. हा प्रकल्प करण्याचे पक्के झाल्यानंतर आमचे सर्व सदस्य तातडीने कामाला लागले. प्रत्येकाने विविध जबाबदाऱ्या अत्यंत खुशीने आपल्या अंगावर घेतल्या. डाऊन टाऊनचे वरिष्ठ सभासद प्रदीप मुनोत आणि शब्बीरभाई ह्यांचे सर्वतोपरी सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला लाभतच होते. त्यांच्याच ओळखीने आझम कॅम्पस येथील कॅम्प भागातील हॉस्पिटलचा हॉल आम्हाला शिबिरासाठी वापरायला मिळाला.
ही सर्व तयारी चालू असली तरी शिबिरासाठी लाभार्थ्यांची नाव नोंदणी करून घेण्याचे आव्हान मोठे होते. प्रदीपभाईंच्या अनुभवानुसार आधीच्या सर्व शिबिरांसाठी नोंदणी फारच कमी होत होती. लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना पूर्णपणे माहिती देऊन त्यांची नोंदणी करून घेणे सोपे नव्हते. त्याकाळी सोशल मीडियाचा वापर अत्यल्प असल्यामुळे खेड्यापाड्यांतील लोकांपर्यंत पोहोचणे अवघड होते.
अनेक वेळा ग्रामीण भागातील लोकांचे कापणी यंत्र वापरत असताना हात कापले जातात. इलेक्ट्रिक शॉकमुळे अथवा अपघातामुळे पण हात कापावे लागतात, तर काही वेळा जन्मतःच हाताची वाढ खुंटलेली असते. अशा सर्व लोकांपर्यंत पोहोचून शिबिराची माहिती देण्यासाठी वर्तमानपत्रासारखे प्रभावी माध्यम वापरले. मी एका जाहिरात संस्थेत कार्यरत असल्यामुळे वृत्तपत्रातील अधिकाऱ्यांशी माझे अतिशय चांगले संबंध होते. ह्याचा फायदा घेऊन आम्ही संपादकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन शिबिरासंदर्भात बातमी प्रसिद्ध करण्याची विनंती केली.
आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन “दैनिक प्रभात’सह महाराष्ट्रातील सर्व नामवंत वृत्तपत्रांनी ह्या बातमीला उत्तम प्रसिद्धी दिली. ही बातमी वाचून झी 24 तास ह्या वृत्तवाहिनीने पण ह्या शिबिराबद्दल एक दृकश्राव्य बातमी तयार केली. आधीच्या शिबिरातील एका लाभार्थीने कृत्रिम हाताने काकडी कापणे, जड पिशवी उचलणे, इतकेच नाही तर स्कूटर चालवण्याचे प्रात्यक्षिक झी24 तासच्या टीमला दाखविले. ह्या सर्वांचा परिणाम असा झाला की पुढील पंधरा दिवस माझा फोन अहोरात्र खणखणत राहिला. लोकांच्या व्यथा समजू लागल्या आणि आपण एक अतिशय उपयुक्त उपक्रम हाती घेतल्याची खात्री पटली.
माध्यमांच्या या सहकार्यामुळे आमच्या शिबिरासाठी अभूतपूर्व नोंदणी झाली. आमचे सर्व सभासद झटून कामाला लागले. वेगवेगळी कामे वाटून घेतली गेली. आलेल्या सर्व लाभार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी चहापाणी, नाश्ता व जेवणाची सर्व व्यवस्था आमच्या सर्व सभासदांनी स्वखर्चाने केली. डाऊन टाऊनच्या सभासदांनी आमच्या सदस्यांना कृत्रिम हात बसविण्याचे प्रशिक्षण दिले. इतकेच नव्हे तर ते आमच्या बरोबर शिबिराच्या दिवशी खांद्याला खांदा लावून उभे राहिले.
शिबिराची वेळ सकाळी 8 वाजताची असली तरी पहाटे 5 वाजल्यापासून महाराष्ट्रभरातून लाभार्थी येऊ लागले. आमच्या सदस्यांनी त्यांची सर्व व्यवस्था अतिशय चोख ठेवली त्यामुळे कुठेही गोंधळ झाला नाही. वेगवेगळ्या टीम्स्नी नोंदणीची तपासणी करणे, कृत्रिम हाताची माहिती देणे, प्रत्यक्ष हात बसविणे, त्यानंतर कृत्रिम हाताच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखविणे आणि लाभार्थ्यांकडून तिथेच प्रात्यक्षिक करून घेणे ह्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय समर्पक भावनेने पार पाडल्या. पाच वर्षांच्या लहान बाळापासून ते पंच्याहत्तर वर्षांच्या आजोबापर्यंत सर्व लाभार्थींना कृत्रिम हात बसविण्यात आले.
एकूणच या शिबिरामध्ये आलेले अनुभव अतिशय हृदयस्पर्शी होते. एका सात वर्षांच्या मुलीला हात बसविल्यानंतर तिने त्या हाताने चमचा पकडून पोहे खाऊन दाखविले. त्या प्रसंगी तिच्या आईवडिलांच्याच नव्हे तर आमच्या सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. कृत्रिम हात बसविल्यावर प्रशिक्षणानंतर सर्व जण त्या हाताचा वापर करून काकडी चिरणे, बॉलपेनने स्वतःचे नाव लिहिणे, चमच्याद्वारे खाद्यपदार्थ खाणे इत्यादी गोष्टी लीलया करू लागले. त्या प्रसंगी त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहेऱ्यावर दिसणारा आनंद पाहून आमच्या सर्वांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली.
शिबिरात वेगवेगळ्या वयोगटातील पुरुष व महिला, गरीब व श्रीमंत असे सगळेच जण सहभागी झाले होते. एक मध्यमवयीन सधन गृहस्थ माझ्याजवळ येऊन त्यांनी मला लगेच हात बसविण्याची विनंती केली. बहुधा त्यांना इतर लाभार्थींबरोबर बसणे कमीपणाचे वाटत होते. तसे त्यांच्या कृतीतून स्पष्ट दिसत होते. पण आमच्यासाठी सर्वजण समान असल्याचे सांगून मी त्यांची विनंती अमान्य केली आणि क्रमानुसार येण्याची विनंती केली. यावर त्यांचा राग अनावर झाला आणि ते आम्हाला वेडेवाकडे बोलू लागले. पण आम्ही गोड बोलून त्यांना शांत केले.
या गृहस्थांना हात बसविल्यावर ते आमच्यासमोर येऊन घळाघळा रडू लागले. आज तब्बल पंधरा वर्षांनंतर त्यांनी स्वतःच्या हातांनी स्वाक्षरी केली होती. त्यांच्या मुलाने परदेशातून दीड लाख किमतीचा हात त्यांना पाठविला होता; पण तो हात अतिशय जड आणि वापरायला अवघड असल्याने त्यांनी तो कधीच वापरला नव्हता. त्या तुलनेने हा मोफत मिळालेला अप्रतिम हात वापरून बघितल्यावर त्यांच्या चेहेऱ्यावरील भाव एकदम बदलून गेले. थोड्या वेळापूर्वी झालेल्या प्रकाराबद्दल पश्चात्ताप होऊन, आम्हा सर्वांचे आभार मानत ते आनंदाने निघून गेले.
यानंतर थोड्याच वेळात माझ्या मोबाइलवर एक कॉल आला आणि समोरील व्यक्तीने मी कुठे आहे असे विचारले. मी हॉलच्या बाहेरच नोंदणी बुथवर उभा होतो. त्या व्यक्तीने मला तिथेच थांबायला सांगितले व पुढच्या पाचच मिनिटांत एक रिक्क्षा टेम्पो करकचून ब्रेक दाबत माझ्याजवळ येऊन थांबला. समोर बघतो तर एक व्यक्ती कृत्रिम हात लावून तो टेम्पो चालवत होती. त्या इसमाने पटकन बाहेर येऊन मला कडकडून मिठी मारली आणि आभार मानू लागला.
मी त्याला विचारले, की तू टेम्पो कोठून आणलास आणि हात बसविल्यावर लगेचच टेम्पो कसा चालविलास? त्यावर तो म्हणाला, की अपघातानंतर त्याचा टेम्पो घरी पडून होता. एका मित्राच्या सहाय्याने तो टेम्पोतून शिबिराच्या ठिकाणी आला होता आणि त्याला पूर्ण खात्री होती की कृत्रिम हात बसविल्यावर तो त्वरित टेम्पो चालवू शकेल व पुन्हा एकदा त्याचा व्यवसाय जोमाने सुरू करू शकेल. त्याचा आत्मविश्वास आणि टेम्पो चालविण्याचे कसब पाहून आम्हा सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली.
अतिशय अवघड परिस्थितीत या सकारात्मक दृष्टिकोनामुळे परिस्थितीवर मात करून आनंदाने जगण्याचे उदाहरण त्या व्यक्तीने आमच्या सर्वांसमोर ठेवले. या उपक्रमाद्वारे मिळालेले समाधान, टीमवर्क आणि उत्कृष्ट नियोजनामुळे यशाची खात्री अशा विविध गोष्टी आम्हाला पुढील अनेक मोठे उपक्रम राबविण्यासाठी उपयुक्त ठरल्या व अजूनही उपयुक्त ठरत आहेत.