करोनाचे संकट देशभर नव्हे; जगभर आहे. त्यातही आपले शहर महाराष्ट्रातले “हॉटस्पॉट’ बनले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील करोनाची बाधा, कम्युनिटी स्प्रेडिंगच्या पातळीवर जाण्याचा धोका उद्भवल्याने काल मध्यरात्रीपासून पुण्यासह पिंपरी चिंचवड सील करण्यात आले आहे. आता येथून लोक बाहेरही पडू शकणार नाहीत आणि बाहेरचे लोकही आत येऊ शकणार नाहीत, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. चीनमध्ये उद्भवलेल्या करोना विषाणूची पुण्याला इतकी गंभीर बाधा होईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नसावे.
पण हे संकट आज आपल्या उंबरठ्यावर आले आहे. लोक धास्तावले आहेत. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या गंभीर बनले आहेत. पण दुर्दैवाने त्यांचे हे गांभीर्य प्रत्यक्षातील काळजी घेताना मात्र तितके जाणवले नाही. काहीही कारण नसताना उगाचच बाहेर भटकणाऱ्या पुणेकरांची संख्या कमी नाही. असल्या भीषण संकटाच्या काळातही “मॉर्निंग वॉक’साठी बाहेर पडणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती. असल्या बेफिकीरीनेच पुण्यात ही स्थिती उद्भवली आहे, असे म्हटले तर कोणाला वावगे वाटायला नको. प्रशासकीय पातळीवरील गलथानपणामुळे “पुणे सील’ करण्याची वेळ आली आहे, असे मात्र म्हणता येणार नाही. त्यांना जितकी काळजी घेता येणे शक्य होते तितकी ती त्यांनी घेतली आहे. पण तरीही हे संकट गहिरे बनले आहे.
आपण देशव्यापी लॉकडाऊनच्याही आधीपासूनच लॉकडाऊन आहोत. सध्याचा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आल्याने सगळेच लोक त्रस्त झालेले दिसले. पण त्यातही 20 एप्रिलपासून लॉकडाऊनमधून काही क्षेत्राला सवलती मिळणार असल्याच्या वृत्ताने सर्वांना जरा हायसे वाटले होते. या सवलती पुण्यातही लागू होऊ शकतील, असे लोक गृहीत धरून चालले होते. पण पुणे हे “हॉटस्पॉट’ ठरल्याने पुण्याला या सवलतींचा लाभ तर झाला नाहीच; पण सध्या लागू असलेली टाळेबंदी अधिक कडक स्वरूपात अंमलात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांनी थोडी कळ सोसूनच प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक ठरणार आहे. पुण्यात आता जीवनावश्वक वस्तूंचा मालही येणे काही ठिकाणी अवघड बनणार आहे, असे एकंदरीत चित्र दिसते आहे.
आतापर्यंत पोलिसांनी ज्या ठिकाणी भाजी किंवा अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला अनुमती दिली होती, ती ठिकाणेही आज पोलिसांनी बंद केली आहेत. त्यामुळे नागरिकांची आबाळ होणारच आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड किमान 27 एप्रिलपर्यंत सील राहणार आहे. त्यामुळे हा आठवडा आपल्या सर्वांचीच कसोटी बघणारा असणार आहे. त्या कसोटीला आपण यशस्वीपणे पार करायचे आहे. ज्या काही अडचणी उद्भवणार आहेत त्या आपल्याला निमुटपणे सोसायच्या आहेत. “करोना’चे कम्युनिटी स्प्रेडिंग टाळण्यासाठीची ही उपाययोजना आहे हे आपण सर्वांनीच लक्षात घ्यायचे आहे. हे सारे होत असताना प्रशासकीय पातळीवरही जरा सुसूत्रता असली पाहिजे हेही नमूद करावेच लागेल.
टाळेबंदीच्या काळातील कारवाईबाबतही ही सुसूत्रता अधिक महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांत एक अशी अडचण लक्षात आली आहे की, सर्वसामान्य आजारावरील रुग्णांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नाहीत. पेशंट दाखल करून घ्यायलाच हॉस्पिटलमधून टाळाटाळ केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. साध्या सर्दी-खोकल्यालाही “करोना’ समजले जाऊ लागले असून या पेशंट्सना सर्रास नायडू रुग्णालयात पिटाळले जात आहे. तेथेही वॉर्ड हाऊसफुल्ल असल्याने त्यांना तेथून ससूनमध्ये आणि त्यानंतर अन्यत्र पिटाळले जात आहे. कोणत्याच रुग्णांच्या बाबतीत अशी हेळसांड होता उपयोगी नाही. रुग्णांच्या बाबतीत ही जशी गैरसोय तशीच जीवनावश्यक समजल्या जाणाऱ्या वस्तूंच्या बाबतही अशीच गैरसोय सध्या सुरू आहे.
एकदा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने किंवा विक्री खुली ठेवण्यास अनुमती द्यायचे ठरवल्यानंतर, पोलीस काही ठिकाणी किराणा दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांना विनाकारणच त्यांचे व्यवसाय बंद करायला का सांगत असतात, हे समजत नाही. या विषयीही एकसमान धोरण ठरले पाहिजे. स्थानिक पोलिसांना वाटते म्हणून कोणतीही विक्री लगेच थांबवणे योग्य नाही. कारण लोकांचीही त्यात गैरसोय होते. काही ठिकाणच्या भाजी विक्रेत्यांना पोलिसांनी पिटाळून लावल्याच्याही काही तक्रारी आज आल्या आहेत. या प्रतिबंधात्मक उपायांच्या संबंधातही एकसमान धोरण ठरले पाहिजे. पुण्याबरोबरच उद्योगनगरी असलेल्या पिंपरी चिंचवडकरांनाही 20 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कडक उपाययोजनांना समोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून या उद्योग नगरीचीही रया गेली आहे.
आधीच मंदीच्या वातावरणाचा सर्वात मोठा फटका बसलेला हा भाग आता लॉकडाऊनमुळेही काळवंडला आहे. शेजारच्या हिंजवडीतल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनाही 20 एप्रिलपासून लागू होणाऱ्या सवलतींचा लाभ मिळण्याची अपेक्षा होती. तीही फोल ठरली असून त्यांनाही या सक्तीच्या टाळेबंदीला सामोरे जावे लागणार आहे. या संकटाचा अंत अजून दृष्टीपथात नाही. हे सगळे कधी संपणार आहे याचा अजून कोणालाच अंदाज आलेला नाही. “करोना’मुळे उद्भवणाऱ्या भविष्यातील आर्थिक संकटाचा आपण जो काही मुकाबला करायचा आहे, तो करूही; पण सध्याचे टाळेबंदीचे संकट कधी दूर होणार याची सर्वच जण प्रतिक्षा करीत आहेत. पुणेकरांनी पानशेत आणि त्याच्याही आधीची प्लेगची साथ ही दोन मोठी संकटे सोसली आहेत. त्याच्या स्मृतीही पुणेकरांनी अजून जपून ठेवल्या आहेत. त्या घटनांचेही स्मृतिदिन वगैरे पुण्यात साजरे होत असतात.
पण या इतिहासकालीन संकटांपेक्षा सध्याचे हे संकट अनेक अर्थाने वेगळे आहे. खरे पुणे पानशेत आपत्तीनंतरच सुधारले, असे अनेक जण आवर्जून नमूद करतात. त्यादृष्टीने पानशेत ही काही पुणेकरांनी इष्टापत्तीच मानली. आता करोनाच्या संकटाचीही परिणीती इष्टापत्तीतच होवो आणि यातून काही तरी चांगला बदल पुण्यात घडो, अशी कामना करायला हरकत नाही. पण त्यासाठी आपल्या सर्वांना या आपत्तीतून आधी बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. सर्व नागरिकांनी जबाबदारीने सहकार्य केले तरच आपण हे आव्हान लवकरात लवकर पार करू शकणार आहोत, हेही आपण लक्षात घेणे गरजेचे आहे.