पुणे – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या पाठींब्याने सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र अद्याप राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. महाराष्ट्रात अतिवृष्टी होते, संकट येतात, सध्या विद्यार्थ्यांच्या एडमिशन सुरु आहेत त्यांचे प्रश्न सोडवणार कोण असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यातील एका इमारतीच्या उदघाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आम्ही दोघे आहोत असं म्हणणारे दोघे पुरु शकतात का याच आत्मचिंतन करा. मला दोघांवर टीका करायची नाही पण वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे.
यामुळे महाराष्ट्राला फटका बसतोय याच भान या लोकांना राहिलेलं नाही असं स्पष्ट मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केलं.
आज यांच्या हातात काहीच नाही जोपर्यंत दिल्लीतून सिग्नल मिळत नाही. त्यावेळेस त्यांचं होणार आहे. तोपर्यंत किती गप्पा मारल्या तरी यांच्या हातून काहीही घडणार नाही. पूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेत जे निर्णय व्हायचे ते महाराष्ट्रात मुंबईत व्हायचे दिल्लीत निर्णय होत नव्हते असं देखील यावेळी अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. तसेच आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.