राहुरी – बाजार समिती राहुरी येथे झालेल्या बैठकीत राहुरी येथील कांदा मार्केट 15 मे पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत विचार विनिमय करुन निर्णय घेणेसाठी बैठकीचे आयोजन केले होते.
अहमदनगरच्या प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आसिमा मित्तल, राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अरुणसाहेब तनपुरे, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, अधिकारी प्रकाश डुकरे व एस.ए. जरे तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र मोरे, पत्रकार राजेंद्र वाडेकर, कांदा आडत व्यापारी, हमाल, मापाडी आदी यावेळी उपस्थित होते. काही नियम तयार करुन राहुरी येथील कांदा मार्केट 15 मे पासून सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
त्यासाठीची नियमावली बाजार समितीच्या वतीने लवकरच जाहीर करण्यात येईल व त्या नियमावलीनुसारच राहुरी तालुक्यातील गरजू शेतकरी बांधवांना आपला कांदा येथे विकता येणार आहे. तब्बल तीन तास सुरू असलेल्या या सभेतील चर्चेनंतर राहुरी येथील कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.