मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारल्याने पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत. आता या यादीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचीही भर पडली असल्याचे दिसत आहे. भाजपाने चारपैकी एकही जागा न दिल्याने रामदास आठवले यांनी नाराजी जाहीर केली आहे.
रामदास आठवले यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये, “महाराष्ट्रात २१ मे रोजी विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील एक जागा भाजपाने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी रिपाइंची मागणी होती. मित्रपक्ष म्हणून भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या चार जागांपैकी एक जागा रिपाइंला न सोडल्याने रिपाइं कार्यकर्ते नाराज आहेत” म्हटले आहे.
महाराष्ट्रात 21 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील 1 जागा भाजप ने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी रिपाइं ची मागणी होती. मित्रपक्ष म्हणून भाजप च्या वाट्याला येणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा रिपाइं ला न सोडल्याने रिपाइं कार्यकर्ते नाराज आहेत.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) May 8, 2020
भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके , डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची घोषणा केली. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले.
राज्यात २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या नऊ जागांच्या निवडणुकीत एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावी या मागणीसाठी रामदास आठवले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भेट घेतली होती. त्यावर विचार करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचं आठवले यांनी सांगितलं होतं.