नवी दिल्ली – आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजनाचे यजमानपद यंदा चीनकडे आहे. मात्र, शांघाय आणि बीजिंगमध्ये पुन्हा एकदा करोनाचा धोका वाढताना दिसत आहे. त्यामुळे या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचा सहभाग धोक्यात आला आहे. या स्पर्धेतील भारताच्या सहभागाबाबतचा निर्णय यजमान चीनशी चर्चा करून लवकरच घेतला जाईल, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असल्यामुळे शांघायमध्ये गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन लावण्यात आले आहे. तसेच चीनची राजधानी बीजिंगमध्येही निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे चीनमधील हांगजो येथे येत्या 10 ते 25 सप्टेंबर या कालावधीत होणारी आशियाई क्रीडा स्पर्धाही पुढे ढकलावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
चीनमधील सध्याची परिस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. आशियाई स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अन्य राष्ट्रांमध्ये चर्चा सुरू आहे. भारतसुद्धा या स्पर्धेतील सहभागाबाबतचा लवकरच निर्णय घेईल. मात्र, त्यापूर्वी यजमान चीनने तेथील परिस्थितीचा आणि त्यांच्या योजनांचा, तसेच ते या स्पर्धेच्या सुरक्षित आयोजनासाठी कशी तयारी करत आहेत, याबाबतची माहिती देणे आवश्यक आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.
करोनाच्या धोक्यामुळे गेल्या दोन वर्षांत चीनमधील अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. तर यावर्षी बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धाचे आयोजन करोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून करण्यात आले. या दोन्ही स्पर्धा प्रेक्षकांविनाच झाल्या. आता करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने आशियाई क्रीडा स्पर्धेबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.