आळंदी – येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात अक्षय तृतीये निमित्त मंगळवारी (दि. 3) श्रींचे संजीव समाधीवर चंदन उटीचा वापर करून विविध लक्षवेधी वस्त्रालंकारांचा तसेच लक्षवेधी फुलांचा वापर करून श्रींचे समाधीवर चंदनउटीतुन भगवान पांडुरंग अवतारातील लक्षवेधी वैभवी रूप साकारण्यात आले. भाविकांनी श्रींचे मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.
माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पालखी सोहळ्याचे प्रमुख ऍड. विकास ढगे पाटील, थोरल्या पादुका देवस्थानचे अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर, विश्वस्त डॉ. अभय टिळक, व्यवस्थापक माऊली वीर आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, पहाटे घंटानाद, काकडा आरती, श्रींचे संजीवन समाधीला पवमान अभिषेक, दुधारती करण्यात आली. दुपारी अडीचच्या सुमारास श्रींचे संजीवन समाधीवर चंदन उटीला सुरुवात करण्यात आली. चंदन उटी काळात श्रींचे समाधी दर्शन बंद ठेवले होते. पांडुरंग आवतारासाठी 40 किलो गोपी चंदन, 5 किलो चंदन, नवीन वस्त्र, अलंकार करून अवतार करण्यात आला होता.
जालना-येवला येथून सुभाष तांगडे यांनी चंदन दिले होते. तर उटी अभिजित दोंडफळे, उमा दोंडफळे, सुशिल सदावर्ते, मोरेश्वर जोशी, योगेश चौधरी, सौरभ चौधरी, अमोल गांधी यांनी साकारली होती. त्यानंतर कलाकारांचा शाल, श्रीफळ देऊन स्वकाम सेवा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. तर भाविकांना कैरीचे पन्हे व डाळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी स्वकाम सेवा मंडळाचे तापकीर, उपाध्यक्ष सुभाष बोराटे, धनाजी गावडे, बाळासाहेब ठाकूर, ज्ञानेश्वर वहिले, लक्ष्मण रासकर, संभाजी चौधरी, संभाजी फुगे, मच्छिंद्र बवले, अनंतकुमार दिंडाळ, रोहिदास थोरवे, आत्माराम सांडभोर, बाळासाहेब गांधिले, नारायण तांगडे आदी उपस्थितीत होते.