मुंबई: केंद्र सरकारचे आज समाजातील पिछडलेल्या वर्गाकडे लक्ष नाही. या वर्गासाठी परिवर्तन करण्याचे काम आपण केले पाहिजे. ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेण्याचे काम करत आहेत. बहुसंख्य लोकांना याची जाणीव नाही, असे मत खा. शरद पवार साहेबांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्सन केले. या बैठकीला मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक उपस्थित होते.
समाजातील अनेक गोष्टींचा परिणाम सामाजिक न्याय विभागात असलेल्या घटकांना बसतो. यासाठी आपण जागरूक राहावे लागेल. एक जबरदस्त संघटन उभारून ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्या पाठीशी उभे राहून, त्यांना न्याय मिळवून देण्याची व्यवस्था आपण करायला हवी. आज तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. आपल्या पक्षाने लहान घटकांना न्याय मिळण्यासाठी सामाजिक न्याय व अल्पसंख्याक विभागाची जबाबदरी स्वतःकडे घेतली आहे. राज्यातील सर्व लहान घटकांना शिक्षण, सुविधा, महिला सुरक्षा अशा सर्व गोष्टीत बळकटी मिळण्याचा प्रयत्न यातून होईल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.