छतरपूर : हिंदू संस्कृतीमध्ये नंदीला अनन्य साधारण असे महत्व आहे. प्रत्येक महादेवाच्या मंदिरा बाहेर नंदीची मूर्ती ही असतेच. दरम्यान, मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बुंदेलखंडमधील केदारनाथ धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या जटाशंकर धाम येथील एका नंदी बैलाचे निधन झाले. यानंतर या नंदी बैलाचे हिंदू विधींनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले, या नंदीला त्याच्याकडेचा वैशिष्ट्यांमुळे स्थानिकांनी हिंदू विधीनुसार अंत्यसंस्कार केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
तीन शिंगे आणि तीन डोळे असलेल्या नंदी बैलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात येत आहे. मंदिर समितीच्या सदस्यांनी नंदी बैलाचा अंत्यसंस्कार विधींनुसार ब्राह्मणांच्या उपस्थितीत मंत्रपठण करण्याचा निर्णय घेतला. गेली 15 वर्षे नंदी ज्या ठिकाणी बसत असे. त्याच ठिकाणी नंदीचा मृत्यू झाल्यामुळे मंदिर समितीने ज्या ठिकाणी नंदी नेहमी बसायचा, त्याच ठिकाणी खड्डा खोदून नंदीची समाधी तयार केली.
हा नंदी बैल 15 वर्षांपूर्वी जटाशंकर येथे फिरत फिरत आला होता. तीन डोळे आणि तीन शिंगांमुळे हा बैल जटाशंकर धाममध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. जेव्हापासून हा बैल याठिकाणी आला. तेव्हापासून लोकांनी त्यांचे नाव नंदी ठेवले, जे काही भक्त जटाशंकर धामला येत असत. ते थोडावेळ नंदीजवळ थांबायचे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत होते.
नंदी बैलाच्या मृत्यूनंतर महिलांनी नंदीच्या मृतदेहाजवळ बसून भजन कीर्तन केले. तसेच, ज्या ठिकाणी नंदीला समाधी देण्यात आली आहे, त्या जागेचा समिती स्मृतिस्थळ म्हणून विकास करणार आहे, असे मंदिर समितीचे अध्यक्ष अरविंद अग्रवाल यांनी सांगितले.