कोपर्डे हवेली – ऊसदरासाठी शेतकरी संघटना ॲक्शन मोडवर असताना काल रात्री ११ च्या सुमारास कराड- मसूर रस्त्यावर धुरुंगमळा नावच्या शिवारात सह्याद्री साखर कारखान्याचे चार आणि सोनहिरा कारखान्याच्या एका ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची हवा अज्ञात शेतकऱ्यांनी सोडली. याबाबत परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत व विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी ऊस दरासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन कारखानदारांना सद्बुद्धी देण्याचे साकडे घातले होते तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दि १७ व १८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर ऊसतोड बंद ठेवण्याचे केलेले आवाहन याला कारखानदार व शेतकऱ्यांकडून कोपर्डे हवेली परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर कोपर्डे हवेली येथे घडलेल्या या घटनेमुळे ऊस दर आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
कारखानदारांनी येत्या चार ते पाच दिवसांत ऊस दर जाहीर न केल्यास ऊसदर संघर्ष समिती शेतकऱ्यांना सोबत घेऊन कारखाने बंद पाडणार. कोल्हापुरात कारखानदारांना ऊस दर जाहीर करणे जमत असेल तर सातारा जिल्ह्यात का नाही.
सचिन नलवडे, (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, रयत क्रांती संघटना)