इंफाळ:- आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना मणिपूरमध्ये घडली आहे. जुलै महिन्यात अपहरण झालेल्या दोन विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यावर हे विद्यार्थी धरणे आंदोलन करत होते. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये किमान 30 विद्यार्थी जखमी झाले आहेत.
पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना हुसकावून लावण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईबद्दल मणिपूरमधील विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. जुलै महिन्यात दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांच्या मृतदेहांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर स्थानिक विद्यार्थ्यांनी दोषींना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर शालेय विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.
फिजाम हेमजीत (20 वर्षे) आणि हिजाम लिथोइनगांबी (17 वर्षे) हे विद्यार्थी जुलै महिन्यापासून बेपत्ता होते. या विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर प्रशासनाने विद्यार्थ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणाचा तपास केला जात असल्याने तपासाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले गेले होते. या हत्येचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पश्चिम इंफाळ जिल्ह्यातील उरीपोक, ओल्ड लांबुलेन, सिंगजामेइ या भागांमध्येही निषेध मोर्चे काढले होते. थाउबाय, काकचिंग आणि बिष्णुरुर जिल्ह्यांमध्येही विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्च्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे वृत्त मिळाले आहे.
पूर्व इंफाळमधील संजेनूपोंग भागामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांनी मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाकडे जाण्यापासून रोखले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तेथेच धरणे आंदोलन सुरू केले होते. या विद्यार्थ्यांना पिटाळून लावण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या लाठीमारामध्ये किमान 30 विद्यार्थी जखमी झाले.