मुंबई – मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. यावरून सर्व नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहे. यातच गुवाहाटी येथे असलेल्या बंडखोर नेत्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.
सुजात आंबेडकर यांनी ट्विट केले आहे की,’प्रिय केसरी टूर्स, गुवाहाटीमध्ये काही कट्टर मराठी लोक अडकले आहेत. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. दुर्दैवाने तुम्हाला हेड काउंट देऊ शकत नाही, कारण आकडे दररोज बदलतात.’ असं म्हणत सुजात आंबेडकर यांनी ट्विट केलं आहे.
तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर खात्यावर एक ट्विट करत याबाबतचा दावा केला आहे. आंबेडकर यांनी, “एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?” असा दावा केला आहे. आंबेडकर यांनी या ट्विटची मांडणी प्रश्नार्थक स्वरूपात केली असली तरी हा त्यांचा शिंदे व भाजप दरम्यान होत असलेल्या वाटाघाटींबाबतचा दावा मनाला जातोय.