मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सतत राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन करून देखील आमदार आपल्या मतावर ठाम असल्याचे दिसते आहे. दुसरीकडे शिवसेना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भावनिक आवाहन केले. अशात आता शिवसेनेची आज बैठक होणार असून काही महत्वाचे निर्णय यात घेतले जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
आम्ही पक्ष वाढवण्यासाठी रक्त सांडले
सध्याच्या राजकीय परिस्थिती बाबत बोलताना संजय राऊत म्हणाले , “पक्षाच्या विस्तारावर चर्चा करू. काही नवीन नियुक्त्या करू. आम्ही पक्ष वाढवण्यासाठी रक्त सांडले आहे. हा पक्ष कोणीही हायजॅक करू शकत नाही. विचारही करू शकत नाही. शेकडो लोकांनी बलिदान दिले आहे. केवळ पैशाच्या जोरावर कोणी पक्ष खरेदी करू शकत नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यावर चर्चा होईल. आता जे संकट आहे, त्याला आम्ही संकट मानत नाही. पक्ष वाढवण्याची ही एक मोठी संधी वाटत आहे, असे संजय राऊत म्हणाले. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक महत्त्वाची असते. आमची बैठक महत्त्वाची आहे. त्यात अनेक निर्णय होतील. वर्तमान भविष्याबाबत विचार करू. असेही ते म्हणाले.
शिवसैनिक रस्त्यावर
दुसरीकडे बंडखोर आमदारांच्या बाबतीत शिवसैनिक आंदोलनाचा पवित्रा घेताना दिसत आहेत. काल शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. औरंगाबादेत क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली तर आज शिवसैनिक अधिक आक्रमक झाले आहेत. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयात शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे.