नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत सध्या तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणे थांबवत नाही, तोपर्यंत भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर खेळणार नाहीत, अशी भूमिका भारताकडून घेतली जात आहे. मात्र, ही भूमीका केवळ क्रिकेटचा संघ पाठवण्याबाबतच आहे. भारतीय टेनिस संघावर असे कोणतेही बंधन नसल्याने डेव्हीस करंडक टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर दाखल झाला आहे. आता आज (शनिवार) व रविवारी या दोन देशांत डेव्हीस करंडक टेनिसचा थरार रंगणार आहे. सामने सकाळी 11.30 वाजता पासून सुरू होणार आहेत.
भारत सरकारने भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली व तब्बल ६० वर्षानंतर भारतीय टीम पाकिस्तान दौरा करत आहे. पाकिस्तान उच्चायुक्तांनी भारतीय डेव्हीस करंडक संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी व्हिसाही जारी केला आहे. आता भारत आणि पाकिस्तान दरम्यान डेव्हिस करंडक स्पर्धेतील जागतिक ग्रुप-१ मधील सामने होणार आहेत. हे सामने ३ आणि ४ फेब्रवारी रोजी इस्लामाबादमध्ये होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे (आयटीएफ) भारताने डेव्हिड स्पर्धेचे सामने पाकिस्तानऐवजी अन्य देशांत हलवण्याची मागणी केली होती. परंतु आयटीएफकडून भारताची मागणी अमान्य करण्यात आली. त्यामुळे अखिल भारतीय टेनिस संघाने (एआयटीए) भारत सरकारला आपल्या संघाला पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली. जर भारतीय संघाने पाकिस्तान दौरा केला नसता तर अंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने पाकिस्तानला वॉकओवर दिला असता व त्यामुळे भारताचे नुकसान झाले असते.
सहा दशकांनंतर पाक दौरा
भारतीय डेव्हिस करंडक संघाने यापूर्वी १९६४ साली पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळी पाकिस्तानचा ४-० असा पराभव भारतीय टीमने केला होता. त्यानंतर २०१९ साली आयोजदोन्ही संघातील डेव्हीस कपचे सामने कजाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही देशांतील तणावपूर्ण संबंधामुळे सामने त्रयस्थ ठिकाणी घेण्याची मागणी भारतीय टेनिस महासंघाने केली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने भारतीय टेनिस संघाची मागणी मान्य केली होती.
#FIHProLeague24 : प्रो लीगसाठी भारतीय हाॅकी संघाची घोषणा; हरमनप्रीतकडे कर्णधारपदाची धुरा…
प्रमुख खेळाडूंची माघार
या स्पर्धेत भारताचे स्टार टेनिसपटू रामकुमार रामनाथन आणि एन श्रीराम बालाजी एकेरी सामने खेळतील. मात्र, अव्वल खेळाडू सुमित नागल आणि शशीकुमार मुकुंद यांनी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या स्पर्धेचे सामने खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचे भारतीय महासंघाला काही महिन्यांपूर्वीच कळवले होते.