नवी दिल्ली – मागील आठवड्यात तामिळनाडूत ‘निवार’ या चक्रीवादळामुळे आतोनात नुकसान झाले. या वादळाचा धोका कमी होताच आता दुसऱ्या नव्या वादळाचा धोका निर्माण झाला आहे.
भारत हवामान विभाग (आयएमडी)ने पुढील चार दिवसांत तामिळनाडूच्या दक्षिण भागात आणखी एका चक्रीवादळाचा धोका असल्याची शक्यता वर्तविली आहे. याबरोबरच हवामान विभागाने चार राज्यांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागानुसार पुढील चार दिवसांत तामिळनाडूसह पद्दुच्चेरी, केरळ आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या राज्यांच्या किनारी भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार हे चक्रीवादळ 2 डिसेंबरला श्रीलंकेचा समुद्रकिनारा पार करून तामिळनाडू आणि केरळमध्ये दाखल होऊन जोरदार पावसाची शक्यता आहे. मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात न जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. पुढील 24 तासांत आणखी दाब वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठे चक्रीवादळ निर्माण होऊ शकते.
मागील आठवड्यात ‘निवार’ चक्रीवादळ तामिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकले होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अडीच लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.