सोरतापवाडी -काल झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे उरुळी कांचन परिसरात अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडून गेले, पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झाडे पडली तर रस्त्यावर पण झाडे पडली होती.
रेल्वे लाइनचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे टिळेकरवाडी, दत्तनगर, तांबेवस्ती यांचा थोडा वेळ संपर्क तुटला होता. अनेक ठिकाणी ड्रेनेजलाइन तुंबलेल्या होत्या. लाइटच्या तारा खांबांसह खाली पडल्या होत्या. याची दखल ग्रामपंचायतीने दखल घेऊन जनजीवन सुरळीत करण्यात येत असल्याचे ग्रामपंचायतीचे सरपंच राजश्री वनारसे यांनी सांगितले.
उरुळी कांचन येथे अवकाळी पावसाने मुख्य पिक असलेला ऊस व अन्य पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच जितेंद्र बडेकर यांनी दिली.
काल परिसरात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे ऊस, फळे, पालेभाज्या, टोमॅटो, फुले आदींचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देऊन त्यांच्यावर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यात यावा, अशी मागणी करणार असल्याचे बडेकर यांनी सांगितले.