वाल्हे -करोनाच्या संकटाविरुद्ध संपूर्ण जग लढा देत असतानाच, शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यामुळे वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
वाल्हे परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी शनिवारी सांयकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अनेकांच्या शेतामधील काढलेले कांदे, भुईमूग, मका आदी पिके पावसामुळे भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच आडाचीवाडी येथील अंजिर, सीताफळ, चिक्कू, आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
जनावरांचा ओला चारा, मका, हत्ती घास, व्हंडी, मेथीघास आदी जनावरांच्या शेतामधील उभा चारा वादळी वाऱ्यामुळे शेतामध्ये पडल्याने शेतकरी वर्गासमोर हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे अनेक विद्युत खांब पडल्याने अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटून पडल्या आहेत.
यामुळे परिसरामधील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करून शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकरी विलास पवार, कैलास पवार, ओम पवार, काशिनाथ पवार, अक्षय पवार, निलेश पवार, प्रकाश पवार आदी शेतकऱ्यांनी केली आहे.