नाशिक – शेतकऱ्यांना नेहमीच संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी पडलेले पीकांचे भाव. मात्र आता अवकाळी पावसाने गहू उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. भारतीय हवामान विभागाने काल रविवारी महाराष्ट्रात 6, 7 आणि 8 मार्चरोजी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यातील लाखलगावात अवकाळी पावसामुळे गव्हाचे पीक झोडपले गेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचे चित्र नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
लाखलगावचे शेतकरी विजय मोडक यांनी 6 एकर जमीनीत गव्हाचे पीक घेतले होते. एकरी साधारणपणे 35 ते 40 हजार खर्च त्यांना आला होता, त्यातून एकरी 60 ते 70 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र अस्मानी संकटामुळे उत्पादन खर्च ही भरून निघतो की नाही अशी स्थिती आहे. गहू झोडपला गेला असून उभं पीक अक्षरशः झोपले गेले आहे. आता आहे तो गहू वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
अवकाळी पावसामुळे गव्हाच्या पिकात दाण्यात आत कुज पडण्याची, दाणे काळे होण्याची भीती आहे. रोग पडतील, उत्पादन खर्चही भरून निघणार नाही. दरम्यान गव्हाबरोबरच आंबा, हरभरा, द्राक्ष या पिकांनाही फटका बसणार आहे. द्राक्ष मण्यांना तडे जाऊन रस गळती होणार आहे. पावसामुळे आंब्यांना आलेला मोहर गळून पडला असून आंबा उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हरभरा पीक तर उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. ही परिस्थिती केवळ नाशिक जिल्ह्यातील नाही तर पालघर, बुलढाणा जिल्ह्यातही अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वाडा, विक्रमगड, जव्हार आणि पालघरच्या काही भागात विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटसह आलेल्या पावसाने, बागायतदार शेतकरी वीट भट्टी व्यवसायिक यांच्यामध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण आहे.