हिंगोली – हिंगोली जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी खरीप पिकांचे नुकसान झाले असून रब्बी पिकांना काही प्रमाणात दिलासा तर काही प्रमाणात फटका बसला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामाच्या काळात कमी पाऊस झाल्यामुळे यंदा उत्पन्न घटले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात व शेवटच्या काळात पाऊस लांबणीवर गेला. आता हिवाळा सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली. रविवारी काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या मात्र मध्यरात्रीपासून काही भागात पावसाचा जोर वाढला होता.
सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा, हत्ता गोरेगाव, पुसेगाव, पानकनेरगाव, धोतरा, खडकी, उटी, कापडशिंगि, यासह आदी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दि 26/ 11/2023 रोजी मध्यरात्री 1 वाजल्या पासून पावसाने सुरुवात केली होती.
सकाळी सहा वाजेपर्यंत हा पाऊस सुरु होता. काही भागात वादळी वाऱ्यामुळे पत्रे देखील उडाले. त्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या पावसामुळे खरिपातील कापसू, तूर पिकांसह रब्बीतील गहू, हरभरा ही कोवळी पिके पाण्याखाली गेली व यात खरीपातील कापसाचे व तुरीचे पिके आडवी झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यंदा खरीप हंगामात पावसाने उघडीप दिल्यामुळे व सोयाबीनवर पडलेल्या यलो मोझॅक रोगामुळे सोयाबीन पिवळे पडून वाळून गेले. त्यामुळे सोयाबीनच्या उताऱ्यात मोठी घट झाली होती. एकरी केवळ तीन किंवा चार क्विंटल उतार आला. त्यामुळे त्यात सोयाबीन पिकांवर केलेला खर्च देखील वसूल झाला नाही. आशा होती ती तूर व कपाशी या पिकांवर.. मात्र अवकाळी पावसाने पूर्ण पिके जमीनदस्त झाले.
अनेक शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही व सरकारचे अनूदानही मिळाले नाही. कर्ज काढून शेतकऱ्यांनी कशी बशी हरभरा, गहू पेरणी केली होती. त्यातच ह्या अवकाळी पावसाने त्याचेही नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडल आहे. ताबडतोब नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.