पुणे- काही महिन्यांपूर्वी उत्पादन अधिक झाल्यामुळे कांद्याला भाव मिळाला नाही. आता अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. दर्जाहिन आणि भिजलेल्या 90 टक्के मालाची आवक मार्केट यार्डात होत आहे.
या पार्श्वभूमीवर दि. 1 एप्रिल ते 31 मेपर्यंत कांदा विक्रीवर अनुदान देण्याच्या मागणीचे निवेदन बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांना बाजार समितीचे माजी संचालक आणि कांद्याचे व्यापारी राजेंद्र ऊर्फ आप्पा कोरपे यांनी दिले आहे.
लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे. यापूर्वीच या मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत कांदा विक्रीवर प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्याप्रमाणे बाजार समितीने तसे अर्ज संबंधित शेतकऱ्यांकडून भरून घेतले आहेत. परंतु प्रत्यक्षात कांदा पिकाचे आवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. आताच अनुदानाची खरी गरज आहे. जास्तीत जास्त अनुदान देण्याची मागणी कोरपे यांनी केली आहे.