हिंगोली – हिंगोली शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलं मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेले पिक जमीनदोस्त झाले. दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हरभरा, ज्वारी, संत्रा, कांदा यासह भाजीपाला आणि फळ बागांना पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. अनेक ठिकाणी ज्वारीचे पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. गुरांचा कडबा देखील भिजला आहे.
संत्र्याच्या बागा पूर्णपणे उध्वस्त; शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी –
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील संत्र्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे. पुसेगाव येथे वादळी वाऱ्याचा पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक कार्याध्यक्ष अतिक अत्तार पुसेगांवकर, शेतकरी तुळशीराम मस्के, बबन कापसे, आत्माराम कापसे, पिंटु गोरे ह्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.