नंदुरबार :- केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.
नंदुरबार तालुक्यातील तलवाडे, बलवंड, खर्दे.खु. येथील सभागृह व रस्ता क्रॉक्रीटिकरण अशा विविध विकास कामांचे भूमीपूजन कार्यक्रम सोमवारी (दि.6) संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. लोकप्रतिनिधीसह उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आपल्या जिल्ह्यात नद्या व धरणामध्ये पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध आहे. हे पाणी प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून या भागात शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी या भागात लहान मोठे कारखाने सुरु करु. यामुळे येथे रोजगाराची संधी उपलब्ध होऊन स्थलातर थांबेल. ज्या गरीब व्यक्तींना घरे नाही त्यांना आदिवासी विकास विभागामार्फत मोठ्या प्रमाणात घरकुलाचे काम घेण्यात येत आहे. ज्या व्यक्तींचे ‘ड’ यादीत नाव अशा सर्व आदिवासी बांधवांना 100 टक्के घरे देण्यात येईल.
या भागातील विविध विकासकामांठी पुढील वर्षी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. केंद्र सरकारने नवीन डी.पी, नवी सबस्टेशन सुरु करणे तसेच जुन्या वीजतारा बदलण्यासाठी निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसाधारण श्रेणीतील नागरिकांनी रोजगार हमी योजनेचे कार्ड व कामगार कार्ड काढून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
Holi 2023 : “होळी व रंगोत्सव साजरा करताना….” होळी, धूलिवंदनानिमित्त राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा
खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या की, विविध योजनेच्या माध्यमातून विठ्ठल मंदीर व मरीमाता मंदीरासाठी सभागृह, वीर एकलव्य सभागृहासाठी पुढील आर्थिक वर्षांत या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनेतून आपल्या गावात 100 टक्के रस्ते व गटारे बांधण्यात येतील. केंद्र सरकारमार्फत दारिद्र्य रेषेखालील लोकांना आरोग्याच्या उपचारासाठी आयुष्यमान कार्ड देण्यात येत असून या कार्डावर देशातील कोणत्याही रुग्णालयात दरवर्षी 5 लाखापर्यंतचा मोफत वैद्यकीय उपचार करण्यात येतात. ज्यांनी आयुष्यमान कार्ड अद्याप बनविले नसेल त्यांनी लवकरात लवकर आयुष्यमान कार्ड काढावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.