नगरपालिका, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; शहरात वाढले घाणीचे साम्राज्य
जामखेड – शहरासह तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. ग्रामीण भागासह शहरातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली असून खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तालुक्यात या महिन्यात 2 जणांना डेंग्यूची लागण झाली असून गेल्या दहा महिन्यात 24 जणांना डेंग्यूसदृश आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डासांच्या उत्पत्तीला पूरक अशी वातावरण निर्मिती झाली आहे. यामुळे पाणी साठवणूक ठिकाणासह नाले व गटार सफाई, औषध फवारणी, कचऱ्याची व्यवस्थिती विल्हेवाट लावली जात नसल्याने अनेक भागांत अस्वच्छता निर्माण झाली आहे. परिणामी, डेंग्यू सारख्या आजाराची लागण झालेले अनेक रुग्ण शहरात आढळले असतानाच ग्रामीण भागातही संशयित रुग्ण शहरात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
शहराला दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा साठा तसेच वापरण्यासाठी लागणारे पाणी नागरिक वेगवेगळ्या टाक्यांमधून साठवत आहेत. तसेच नगरपालिकेकडून शहरात अनेक ठिकाणी भूमिगत गटारे करण्यात आली आहेत. मात्र अनेक ठिकाणी चेंबरवर झाकणे न बसविल्याने त्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढले आहेत. शहरात 15 दिवसापासून सुरू असलेल्या डेंग्यूच्या थैमानाने नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. सध्या लागण झालेले दोन रुग्ण नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर डेंग्यूसदृश रुग्ण शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यामुळे नगरपालिका व पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने त्वरित लक्ष देऊन डास निर्मूलनाचे काम गतिमान करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. आरोग्य विभागाने शहरातील काही भागातील पाहणी करताना ठिकठिकाणी निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य, साचलेल्या पाण्यांमुळे डासांची उत्पत्ती वाढल्याचे सांगत नगरपालिकेच्या विभागाने स्वच्छतेबाबत पुढाकार घेण्याच्या सूचना केल्या आहेत. आरोग्य विभाग व नगरपालिक प्रशासनाच्या भूमिकांमध्ये मात्र सर्वसामान्य व्यक्तिंना आजारपणाला सामोरे जावे लागत आहे.
शहरामध्ये औषध फवारणी होणे अपेक्षित आहे. ती वेळेवर न झाल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. जामखेड शहरात नगरपालिकेकडून थातूर – मातूर औषध फवारणी करत डास निर्मूलनाचे काम सुरू आहे. रोगराई निर्मूलन करण्यासाठी किंवा डासाची उत्पत्ती कमी होण्यासाठी पालिका प्रशासनात अपेक्षित प्रयत्न करीत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. सध्याची एकूण परिस्थिती पहाता डोळेझाकपणे कामकाज सुरू असून डेंग्यूसदृश आजार याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. याकडे होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये लूटमार सुरूच
तालुक्यातील 58 गावांशी संलग्न असलेल्या शहरात खासगी रुग्णालय चालकांची दुकानदारी जोमात आहे. रुग्णांना उपचारासाठी शासकीय सक्षम यंत्रणाच नसल्याने आजारांचे निदान करण्यासाठी खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे खासगी रूग्णालयांमध्ये रुग्णांच्या रांगा वाढल्याचे पाहून काही खासगी रुग्णालय चालकांनी उपचाराच्या नावाखाली लूटमार सुरू केल्याचे चित्र आहे.