राहुरी – तालुक्यातील प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे यावर्षी दोन्ही साखर कारखाने बंद राहणार आहेत. अशी परिस्थिती तालुक्यात प्रथमच उद्भवली आहे. तालुक्यातील उपलब्ध उसाच्या गाळपासाठी ऊस उत्पादकांना अन्य सहकारी व खासगी साखर कारखान्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
राहुरी तालुका हा उसाचे आगर समजला जातो.
दरवर्षी दहा ते अकरा लाख मेट्रिक टनापर्यंत ऊस तालुक्यात उत्पादित होतो. गत वर्षीच्या हंगामात प्रसाद शुगर व डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याने मिळून सुमारे चार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. तर तीन लाख मेट्रिक टन ऊस जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अन्य सहकारी अन्य साखर कारखान्यांनी गाळपासाठी नेला.
गतवर्षी पडलेला कमी पाऊस यामुळे मुळाधरणाचे एकच आर्वतन शेतीसाठी मिळाले. त्यामुळे उसाचे क्षेत्र घटले. हुमणी अळीमुळे उत्पादनात मोठी घट झाली. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याकडे 65 हजार व प्रसाद शुगर मिल्ककडे 1 लाख 40 हजार मेट्रिक टन उसाची नोंद झाली आहे. गाळप क्षमतेचा विचार करता दहा टक्के देखील ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध नाही.
उसाचे टिपरु देखील कार्येक्षेत्राबाहेर जाऊ दिला जाणार नाही, अशी भाषा दोन दशकापूर्वी तालुक्यात ऐकायला मिळत होती. त्याच उसाच्या आगारात आज उसाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ती इतकी गंभीर आहे की यंदा दोन्हीही साखर कारखाने बंद राहणार आहेत. तालुक्यातील दोन्ही कारखाने मिळून दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करीत होते व अन्य कारखाने दोन लाख मेट्रिक टन ऊस नेत होते.
त्याच तालुक्यात आज हंगामासाठी जेमतेम दीड-दोन लाख टन ही ऊस उपलब्ध नाही. जो ऊस ऊपलब्ध आहे त्याचे या गाळपासाठी अन्य कारखान्यांवर अवलंबून रहावे लागण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या कार्यक्षेत्रात दाखल झाल्या आहेत. काही कोटी रुपयांची ऊलाढाल उसासारख्या नगदी पिकात होत होती. प्रतिकूल निसर्गाचा तालुक्यातील अर्थकारणाला मोठा फटका बसला आहे.