मुंबई – मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागला असून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वाटेवर आहेत. या आंदोलनादरम्यान अनेकांना मुंबईत आंदोलकांचे जेवणाचे काय होणार? हा मोठा मुद्दा समोर आहे. कारण या आंदोलनात लाखोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. याबाबत मुंबईच्या डबेवाल्यांनी मोठं पाऊल उचलले आहे. मराठा आरक्षणाला हातभार लावण्यासाठी मुंबईचे डबेवाले अतिरिक्त सेवा पुरवणार आहेत. डबेवाला रोटी बँकच्या साहाय्याने आंदोलकांना जेवणाची सोय करण्यात येणार आहे.
यावर बोलतांना कैलास शिंदे म्हणाले की, २६ जानेवारीपासून माझ्यासारखे अनेक डबेवाले कामगार दोन डबे घेऊन घराबाहेर पडणार आहोत. एक डबा स्वतःसाठी आणि एक डबा भुकेल्या मराठा आंदोलकांसाठी. जिथे मराठा आंदोलक दिसणार त्याला डबा खाऊ घालायचा, असे शिंदे म्हणाले.
कैलास शिंदे शेकडो डबेवाल्यांसोबत अतिरिक्त डब्याची सोय करणार आहेत. त्यासोबतच डबेवाला रोटी बँकच्या गाड्या २४ तास अन्न पुरवण्याची सेवा देणार आहेत. पुढे ते म्हणाले की, यामागचा आमचा उद्देश मात्र एकच आहे. कोणताही मराठा आंदोलक हा उपाशीपोटी राहू नये.
मोर्चाला हातभार लागणार
मुंबईतील डबेवाला कामगार हा मराठा आहे. काम ही ईश्वर पुजा आहे, असे मानून तो मुंबईत काम करतो. आर्थिकदृष्ट्या डबेवाला जरी गरीब असली तरी तो मराठा आरक्षणाला हातभार लावण्यासाठी पुढे आला आहे. आरक्षणाचा मोर्चा मुंबईत आल्यानंतर या मोर्चाला आपलाही मदतीचा काही हातभार, खारीचा वाटा का होईना पण त्यात असला पाहीजे असे या डबेवाल्यांचे म्हणणे आहे.