मुंबई – राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची स्थापना, कॉर्पस फंड आणि अडचणीत सापडलेल्या वेठबिगारांच्या मुक्ततेसोबतच त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्यात येत आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये राज्यातील एकूण १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली असून त्यातील १०४ वेठबिगार हे कातकरी समाजातील होते.
राज्यात मागील दोन वर्षात १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्ह्यामध्ये जानेवारी, २०२१ ते डिसेंबर, २०२३ या कालावधीत कातकरी समाजातील एकूण ६७ बेठबिगार आढळून आलेले आहेत. पालघर जिल्ह्याचे रहिवासी असलेले एकूण २३ वेठबिगार कामगार हे सन २०१९ मध्ये १३ व सन २०२० मध्ये ५ असे एकूण १८ वेठबिगार ठाणे जिल्ह्यात आढळून आलेले आहेत.
तसेच सन २०२२ मध्ये ५ कामगार अहमदनगर जिल्ह्यात काम करताना आढळून आलेले असून त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये कातकरी समाजातील एकूण ३७ वेठबिगार कामगार (नाशिक जिल्ह्यातील १ व अहमदनगर जिल्ह्यातील ३६) आढळून आलेले आहेत तर रायगड जिल्ह्यामध्ये जानेवारी, २०२१ ते डिसेंबर, २०२३ या कालावधित कातकरी समाजातील एकही बेठबिगार आढळून आलेला नसल्याची माहिती कामगार विभागाने दिली आहे.