मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २९४ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती शनिवारी (25 एप्रिल) महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये २९४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, त्यापैकी १३ गुन्हे अदखलपात्र (एन.सी) आहेत. त्यामध्ये बीड २८, पुणे ग्रामीण २३, मुंबई २०, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली १२, नाशिक शहर ११, नाशिक ग्रामीण १०, बुलडाणा १०, जालना ९, लातूर ९, सातारा ९, नांदेड ९, परभणी ७, सिंधुदूर्ग ७, ठाणे शहर ७, नवी मुंबई ७, ठाणे ग्रामीण ६, हिंगोली ६, नागपूर शहर ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, अमरावती ४, पुणे शहर ४, रत्नागिरी ४, भंडारा ३, सोलापूर शहर ३, चंद्रपूर ३, रायगड २, धुळे २, वाशिम २, पिंपरी- चिंचवड १, औरंगाबाद १ (एन.सी) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने विश्लेषण केले. या विश्लेषणानूसार आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १२२ तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १०७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी ९ गुन्हे व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब ) गैरवापर केल्या प्रकरणी ४७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ७७ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी ३६ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहेत.