मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २९४ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती शनिवारी (25 एप्रिल) महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये २९४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ९ वर गेली आहे.
सदर आरोपीने आपल्या फेसबुक अकाऊंट वरून कोरोना महामारीच्या संदर्भात चुकीची माहिती देणाऱ्या पोस्ट्स टाकून व तसेच आपल्या मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सॲप ग्रुपवर कोरोना महामारीच्या संदर्भात चुकीची माहिती देणारे मेसेजेस फॉरवर्ड केले होते, त्यामुळे परिसरात भीती पसरून व शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता.