World Cup 2023 Final Match : भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी (16 नोव्हेंबर) कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळवला जात आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मैदानावर अंतिम सामना होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मैदानावर भारतासोबत अंतिम सामना खेळणाऱ्या संघाचा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दैनिक जागरण या वृत्त वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
दरम्यान, विश्वचषक 2023 अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पहिला उपांत्य सामना भारत वि. न्यूझीलंड यांच्यात झाला.आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ दुसऱ्या उंपात्य सामन्यात आमनेसामने आहेत. यातील विजयी संघ भारतासोबत अंतिम सामना खेळेल आणि अंतिम सामन्यानंतरच विश्वविजेतेपदाचा निर्णय होणार आहे.
क्रिकेटचा महाकुंभ पाहण्याची क्रिकेट चाहत्यांना अखेरची संधी
वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. बीसीसीआयने अंतिम सामन्याच्या तिकिटांचे थेट बुकिंगही सुरू केले आहे. क्रिकेटच्या महाकुंभाचा शानदार सामना पाहण्याची क्रिकेट चाहत्यांना अखेरची संधी आहे.
अहमदाबाद स्टेडियममध्ये 1.32 लाख प्रेक्षकांची क्षमता..
नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता 1.32 लाख प्रेक्षकांची आहे. अंतिम सामन्यापूर्वी हे मैदान भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील शानदार सामन्यात प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला.
उपांत्य फेरीतील विजयानंतर पंतप्रधानांनी केले होते संघाचे अभिनंदन
Today’s Semi Final has been even more special thanks to stellar individual performances too.
The bowling by @MdShami11 in this game and also through the World Cup will be cherished by cricket lovers for generations to come.
Well played Shami!
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2023
टीम इंडियाच्या सेमीफायनलमधील धमाकेदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्वीट केलं. त्या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. की, “आजची सेमीफायनल अधिक खास बनली ती शानदार वैयक्तिक कामगिरीमुळे. शमीच्या गोलंदाजीबाबत पंतप्रधानांनी लिहिले होते की, मोहम्मद शामीची तुफानी गोलंदाजी क्रिकेटप्रेमींच्या भावी पिढ्यांच्या स्मरणात राहील. वेल प्लेड शमी!’
दरम्यान, विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत चार गडी गमावून 397 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकांत 327 धावांत ऑलआऊट झाला आणि सामना 70 धावांनी गमावला. या सामन्यात भारताकडून मोहम्मद शामीनं 9.5 षटकांत 57 धावांत सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं.