Rohit Sharma on Mumbai : विश्वचषक 2023 स्पर्धेत विजयी षटकार ठोकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा ताफा आता मुंबईत पोहोचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा श्रीलंकेशी सामना होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे, मात्र त्याआधी कर्णधार रोहितच्या एका प्रतिक्रियेने चाहत्यांची चिंता वाढवली आहे.
2023 विश्वचषकाचा 33वा सामना भारत आणि श्रीलंका (Ind vs SL) यांच्यात गुरुवार, 2 नोव्हेंबर रोजी मुंबईत खेळवला जाईल. यासाठी भारतीय क्रिकेट संघ सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी मुंबईत पोहोचला आहे.
रविवारी, 29 ऑक्टोबर रोजी लखनौमध्ये भारताने इंग्लंडचा पराभव केला होता. यानंतर भारतीय संघाला पुढील सामन्यासाठी 3 दिवसांचा वेळ मिळाला आहे. काल संघ मुंबईत पोहोचला असून आजपासून त्याचे सराव सत्र सुरू होणार आहे, मात्र त्याआधीच भारतीय कर्णधार रोहित शर्माने अशी प्रतिक्रिया दिली आहे ज्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.
मुंबईच्या प्रदूषणावर रोहितची प्रतिक्रिया…
मुंबईच्या प्रदूषणाबाबत रोहितने प्रतिक्रिया दिली आहे. रोहितने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्याने इंस्टा स्टोरीवर मुंबईच्या प्रदूषणाचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे- “मुंबई, हे काय झालंय…” (Mumbai, yeh kya ho gaya) हेलिकॉप्टर किंवा विमानात बसून रोहितने हा फोटो क्लिक केल्याचे दिसत आहे.
मुंबईचे वातावरण चांगले नाही
दिल्लीनंतर आता मुंबईतही वायू प्रदूषण वाढत आहे. हवेची गुणवत्ता खराब (Air Quality) होत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील खराब वातावरणामुळे आता चिंता वाढली आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मांनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवामान चिंतेचे कारण बनले आहे. प्रदूषणामुळे लोक हैराण झाले आहेत. रोहित शर्मापूर्वी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटनेही चिंता व्यक्त केली होती.
काय म्हणाला होता जो रूट?
या विश्वचषकात मुंबईच्या खराब हवेच्या गुणवत्तेमुळे आश्चर्यचकित झालेला रोहित हा पहिला क्रिकेटर नाही. इंग्लंडच्या सामन्यांदरम्यान जो रूटनेही याबाबत तक्रार केली होती. तो म्हणाला, “मी याआधी अशा हवामानात खेळलो नाही. मी साहजिकच जास्त उष्ण वातावरणात आणि कदाचित जास्त दमट परिस्थितीत खेळलो आहे, पण पहिल्यादांच तुम्ही श्वास घेऊ शकत नाही असे मला मुंबईत वाटले.”
वायू प्रदूषणामुळे मुंबईकरांची चिंता वाढली..
गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील हवामान चिंतेचा विषय आहे. CPCB च्या मते, मंगळवारी सकाळी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 161 वर होता, जो ‘मध्यम’ श्रेणीत येतो. सर्वात खराब हवेची गुणवत्ता वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नोंदवण्यात आली जिथे AQI पातळी 257 वर पोहोचली, त्यानंतर सायन जिथे AQI 218 वर तर वांद्रे पूर्वेतील खेरवाडी परिसरातील AQI 198 आणि कुलाब्यातील नेव्ही नगरमध्ये AQI हा 189 मध्ये नोंदवले गेले.