शिवसेनेची सामनामधून केंद्र सरकारवर टीका
मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील काडीमोड झाल्यानंतर सेनेकडून रोज भाजपवर कोणते ना कोणते आरोप होत आहेत. त्यातच आता शिवसेनेने देशात सरकारकडून औषधांच्या वाढलेल्या किंमतीवरून सरकारला धारेवर धरले आहे. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. मलेरिया, टीबीसह औषधांच्या किंमतीमध्ये राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) तब्बल 50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता वाढ करण्यात आलेल्या औषधांची खरेदी रुग्णांना महागात पडणार आहे. वाढवलेल्या औषधांच्या किंमतीमध्ये ऍन्टिबायोटिक, कुष्ठरोग, मलेरिया आणि टीबीच्या आजारांवरील औषधांचा समावेश आहे. यावरून आता शिवसेनेने केंद्र सरकारचे कान टोचले आहेत.
जगण्यासाठी लागणारे अन्नधान्यही महाग आणि मरण टाळण्यासाठी लागणारी औषधेदेखील महाग. या दुष्टचक्रातून सामान्य माणसाने बाहेर कसे पडायचे? ज्या सरकारने बाहेर काढायचे ते सरकारच महागाईचे दणके देत त्याला त्या चक्रात ढकलते आहे. अन्नधान्य महागले म्हणून जगणे टाळा आणि जीवनावश्यक औषधे महागली म्हणून मृत्यूला जवळ करा, असे सरकारचे म्हणणे आहे काय? असा सवाल शिवसेनेने केला आहे.
केंद्रातील सरकार या देशातील जनतेचे जिणे सुसह्य करण्यासाठी सत्तेवर आले आहे की असहय करायला? अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू यांचे भाव तर आकाशाला भिडलेच आहेत. आता जीवनावश्यक औषधांच्याही दरवाढीचा दणका केंद्र सरकारने दिला आहे. एकीकडे आर्थिक मंदीने रोजगारावर गदा आणली आहे. सरकार बरेच दावे करीत असले तरी मंदीमुळे सर्वच क्षेत्रांच्या बाजारपेठा सुस्तावल्या आहेत.
रोजचे पोट भरायची जेथे मारामार तेथे इतर गोष्टींची खरेदी काय करणार? जनतेच्या खिशात पैसा असेल तरच खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. येथे या पैशालाच ओहोटी लागली आहे आणि दरवाढीची भरती थांबायची चिन्हे नाहीत असा आरोप शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून केंद्र सरकारवर टीका केली आहे.