मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणातील पाणीसाठा खूप कमी झाला असून, जुने आंबेगाव गावठाणातील घराचे अवशेष आणि प्रसिध्द जैन मंदिर पूर्णपणे उघडे पडल्याने भाविक आणि पर्यटकाची मंदिर पाहण्यासाठी गर्दी होत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर व शिरूर या तालुक्यांसह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीक्षेत्र सिंचनाखाली आणण्यात व या भागातील अनेक गावांच्या पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणामध्ये (हुतात्मा बाबू गेनू सागर) अनेक गावे जलसमाधिस्त झाली.
त्यात तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले व उत्तर पुणे जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ असलेले आंबेगावही आहे. जलसमाधिस्त झालेल्या आंबेगावातून पूर्वी आंबेगाव तालुक्याचा पूर्ण कारभार चालत असे. येथील बाजारपेठ मोठी होती व संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिध्द होती. मात्र, डिंभे धरणात पाणी साठविण्यास सुरवात झाल्यानंतर हे गाव विस्थापित करावे लागले.
यावर्षी डिंभे धरणातील पाणीसाठा खूप कमी झाला असल्याने धरणात गेलेल्या गावांचे अवशेष उघडे पडले आहेत. डिंभे धरणाहून आहुपेकडे जाताना दूरवरूनच जुन्या आंबेगावमधील जलसमाधिस्त झालेले, मात्र सध्या उघडे पडलेले जैन मंदिर नजरेस पडते. जसजसे मंदिराच्या जवळ जातो तसतसे जुन्या आंबेगावचे आवशेष ठळकपणे पाहायला मिळतात. सध्या मंदिरामध्ये सहज जाता येत आहे.
मंदिर परिसरात शिलालेख-विहिरी
पूर्ण दगडात असलेल्या या जैन मंदिरात जैन धर्मातील श्री कल्याण पार्श्वनाथ, श्री विमलनाथ, श्री वासुपुज्य स्वामी या देवतांच्या मूर्ती असल्याचा शिलालेख आढळून येतो. मंदिरापासून पूर्वेकडे थोड्याच अंतरावर गाव पाणीपुरवठ्याची विटांमध्ये जुन्या शैलीत व नक्षीत सुंदर बांधकाम असलेली विहीर पाहायला मिळते. मंदिराच्या आजूबाजूला पडलेल्या घरांचे अवशेष, पडलेल्या इतर मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात.
सातवाहन काळातील लक्ष्मीची मूर्ती
जैन मंदिराच्या समोरील एका पडलेल्या हिंदू मंदिरांच्या अवशेषांमध्ये ग्रामदेवता लक्ष्मीची मूर्ती पाहायला मिळते. मूर्तीचा बारकाईने अभ्यास केल्यास ही मूर्ती सातवाहन काळातील असावी असा अंदाज पुरातत्व विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे जलसमाधिस्त झालेल्या या गावाचा इतिहास अतिप्राचीन सातवाहन काळापर्यंत पोहोचतो. जुने आंबेगाव धरणाच्या पाण्यात गेल्याने मायभूमीपासून दूरवर पुनर्वसित झालेल्या गावकरी सध्या पाण्याबाहेर आलेल्या या भागात येऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत.
समृद्ध आंबेगावच्या खुणा
डिंभे धरण झाल्यापासून पाण्याखाली राहूनही हे जैन मंदिर अजूनही सुस्थितीत आहे. मंदिरात आत-बाहेरून असलेली कलाकुसर, कोरीव आणि नक्षीकाम आजूनही जसेच्या तसे आहे. पाण्याखाली गेलेल्या आंबेगाव गावठाणातील उघडे पडलेले अवशेष, तेलाचे घाणे आणि जैन मंदिर पाहता त्याकाळचे महत्त्वाचे व्यापारी ठिकाण असलेले आंबेगाव किती समृद्ध असेल याचा अंदाज येतो.