मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या दुष्काळी गावांमध्ये चाऱ्याची टंचाई भासू लागली असून शेतकऱ्यांना जनावरांसाठी विकतचा चारा घ्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित कोलमडले आहे. तर पुढील काही दिवसात पाण्याची टंचाई देखील भासणार आहे.
आंबेगावच्या पूर्व भागात दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे जनवारांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे, दुधाचे पडलेले दर त्याचप्रमाणे चाऱ्याची भीषण टंचाई, अशा दुहेरी संकटामध्ये येथील शेतकरी सापडलेला आहे. शेती त्याचप्रमाणे शेतीला जोडधंदा म्हणून येथील शेतकरी प्रमुख व्यवसाय म्हणून दुध धंदा करत असतात, आज येथील शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पारनेर तालुक्यातून कडबा विक्रीसाठी आलेले व्यापारी नंदू जाधव म्हणाले, साडेतीन हजार रुपये शेकडा या दराने कडबा मंचर, घोडेगाव परिसरातील शेतकरी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पोंदेवाडी, सविंदणे त्याचप्रमाणे निमगाव दावडी शेलपिंपळगाव या परिसरातुन शेतकरी जनावारांसाठी चारा खरेदी करत आहे. परंतु सध्या चाऱ्याच्या टंचाईमुऴे चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
अनेक शेतकरी इतर तालुक्यातून साडेतीन ते साडेतीन हजार रुपये शेकडा दराने कडबा विकत घेत आहे. तसेच सदर कडबा चारा वाहतुकीसाठी आणि मजुरीसाठी शेतकऱ्यांना वेगऴाच अतिरिक्त खर्च करावा लागत आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याच्या आर्थिक गणित कोलमडले आहे.
गुरे, शेती जगवण्यासाठी टॅंकरचा आधार
आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे येथील शेतकरी सुहास रणपिसे, संतोष तांबे, गोरक्ष तांबे, सुधीर तांबे, संदिप मिंडे या दुग्धव्यावसायिकांनी सांगितले की जनावरे शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे पाळली असून दुग्ध व्यवसायातून दोन रुपये मिळतात ही जनावरे सोडून देता येत नाहीत.
त्यामुळे त्यांना जगवण्यासाठी विकत चारा आणणे गरजेचे आहे. सध्या चाऱ्याची टंचाई भासत असून पिण्याच्या पाण्याचीही कमतरता भासू लागली आहे त्यामुळे पुढील काही दिवसात टँकर चालू करावे लागतील.अशीही परिस्थिति असल्याचे शेतकरी सांगत आहेत.