मुंबई – भारतीय जनता पक्षाने सन 2019 साली शिवसेना-भाजप युतीत जो करार झाला होता त्याचे पालन केले असते तर आज फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागल्याने जी मोठ्या मनाची ढाल पुढे करावी लागली आहे ती करावी लागली नसती असा निशाणा शिवसेनेने पुन्हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला आहे.
पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात फडणवीस यांचे नाव न घेता शिवसेनेने म्हटले आहे की महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचे जे राजकीय नाट्य घडवले जात आहे, त्या नाट्याचे अद्याप किती अंक बाकी आहेत याविषयी आज तरी कोणीही ठामपणे काहीही सांगू शकत नाही.
महाराष्ट्र हादरला! अमरावतीत नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या केमिस्टची निर्घृण हत्या
गुरूवारी संध्याकाळी राजभवनात या नाट्याचा क्लायमॅक्स झाला. उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांचे नाव घेतले जात होते ते थेट मुख्यमंत्री झाले आणि जे हमखास मुख्यमंत्री होणार होते त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले आहे. या क्लायमॅक्सवर टिकेचा भडिमार होत असताना मोठे मन, पक्षनिष्ठेचे पालन असा बचाव समोर आला. तथापि मन आणि अपराध यांच्या सुस्पष्ट व्याख्या मांडणाऱ्या वाजपेयी युगाचा केव्हाच अंत झाला आहे.
कराराप्रमाणे शब्द पाळण्याचे मोठे मन अडीच वर्षांपुर्वी भाजपने दाखवले असते तर आज मोठे मन या शब्दप्रयोगाची ढाल पुढे करण्याची गरजच भासली नसती असेही शिवसेनेने या अग्रलेखात म्हटले आहे.